दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही असे वक्तव्य श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये थोड्याफार प्रमाणात धुसफूस पाहायला मिळत आहे. यावरून राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मतभेद बाजूला ठेवत एकत्र जरी आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षातील नेते, कार्यकर्ते नाखुष असल्याचेच दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनंत गीते यांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य योग्यच असल्याचं म्हटलं आहे.

 “अनंत गीतेंनी काही चुकीचं म्हटलेलं नाही. अनंत गीतेंनी हेच म्हटलं आहे की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही. यात चुकीचं काही नाही. महाविकास आघाडी ही त्यावेळची राजकीय परिस्थितीनुसार तयार झाली आहे. हे बरोबरच आहे. अनंत गीते काय चुकीचं बोलले नाहीत,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

अनंत गीतेंची जी भावना आहे त्याबद्दल विचारले असता नाना पटोलेंनी भाष्य केलं आहे. “शिवसेना आणि काँग्रेस एका विपरित परिस्थितीमध्ये एकत्र आलेली आहे. सोनिय गांधींनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येत असल्याचे सांगितले होते,” असे नाना पटोलेंनी म्हटले. तर शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर आम्ही कोणतंही भाष्य करनार नाही असे नाना पटोले म्हणाले.

काय म्हणाले होते अनंत गीते?

”काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे,” असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे.

नाना पटोलेंनी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबाबतही भाष्य केलं आहे. “राज्यपालांची एक व्याप्ती आहे. राज्यपाल जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही मिटींग घ्यायला निघाले होते. राज्यपालांनी शासनाच्या कामात रोजचं हस्तक्षेप करावा असा काही नविन आयाम केंद्राने सुरु केला असेल तर माहिती नाही. अलिकडच्या काळात हे पाहायला मिळत नाही. राज्यपालांनी अधिवेशनाची मागणी करावी ही नविनच परंपरा पाहायला मिळत आहे,” असे नाना पटोले यांनी म्हटले.