विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. तर नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने ऐनवेळी अर्जच भरला नाही. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये भाष्य करण्यात आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे आणि पुत्र सत्यजित तांबे यांचे आधीपासूनच ठऱलेले होते. महाविकास आघाडीत गोंधळ उडाला आहे. फासे उलटे पडताना दिसत आहेत. फडणवीसांनी याबाबत संकेत दिले होते. पण काँग्रेसला जाग आली नाही, असे मत सामनामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

सुधीर तांबे यांनी पक्षाचा ‘एबी’ फॉर्म असूनही पक्षातर्फे अर्ज भरला नाही

“नाशिक पदवीधर मतदारसंघात तर सगळेच उलटे पालटे घडले. काँग्रेस उमेदवार विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक मारलेली पलटी धक्कादायक आहे. डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. पण डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचा ‘एबी’ फॉर्म असूनही पक्षातर्फे अर्ज भरला नाही. मात्र त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. मुलास आमदार करावे याच उदात्त हेतूने डॉ. तांबे यांनी ही खेळी केली व त्यामागे भारतीय जनता पक्षाचे पेच आहेत. भाजपा आता सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची भाषा करू लागला आहे. हे औदार्य काय अचानक उफाळून आलेले नाही,’ अशी भूमिका सामना दैनिकात मांडण्यात आली.

हेही वाचा >>>> चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फी जावेदची महिला आयोगाकडेही धाव; रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाल्या…

सुधीर तांबे यांच्या निर्णयामुळे काँगेसची अवस्था खराब झाली

‘सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे. म्हणजे थोरात हे त्यांचे मामा. पुन्हा सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांत त्यांची गणना होते. मागच्या निवडणुकीत राहुल गांधी हे नगर येथे प्रचारासाठी आले असताना गांधी यांनी सत्यजीत तांबे यांच्याच निवासस्थानी मुक्काम केला होता. इतके जवळचे नाते. राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतही सत्यजित तांबे सामील झाले. अशा माणसाने फक्त एका आमदारकीसाठी भाजपच्या खेळीचे बळी व्हावे हे न पटणारे आहे. सत्यजीत तांबे व डॉ. सुधीर तांबे यांच्या निर्णयामुळे काँगेसची अवस्था खराब झाली. आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही. नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे,’ असे सामनामध्ये म्हणण्यात आले.

हेही वाचा >>>> “एकही देव बॅचलर नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची भेट मारूतीराया घेणार आणि…” जितेंद्र आव्हाड यांचा टोला

महाविकास आघाडीत बेकीचे चित्र उभे राहिले

‘महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. पाच जागी निवडणुका होत आहेत. त्याबाबत एकत्र बसून काही साधकबाधक चर्चा झाली काय? काही नियोजन, बांधणी ठरली काय? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. अमरावतीमध्ये काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नसताना त्या जागेसाठी हट्ट करून लढणे हा प्रकार नक्की काय म्हणावा? शेवटी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लिंगाडे यांना काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारीची हळद लावावी लागली. मग ही जागा शिवसेनेस सोडली असती तर लिंगाडे हे तयारीनिशी लढले असते. लिंगाडे यांनी लढण्याची तयारी केली होती व मतदार नोंदणीस जोर लावला होता. नागपुरातील शिक्षक मतदारसंघ काँग्रेसने शिवसेनेसाठी सोडला, पण तेथे आता काँगेस व राष्ट्रवादीनेही त्यांचे उमेदवार टाकल्याने बेकीचे चित्र उभे राहिले,’ असे मत सामनामध्ये व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा >>>> अशोक चव्हाणांनी दिला पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले “कोणत्या घोड्यावर…”

तरीही मैदान सोडता येणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नाशिक पदवीधर मतदारसंघात ‘तांबे’ मंडळींची तयारी आधीपासूनच सुरू होती व गेल्या महिन्यात एका जाहीर कार्यक्रमात श्री. फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही व एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली. या सगळय़ात गोंधळ उडाला तो महाविकास आघाडीचा. वास्तविक महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती, पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. तरीही मैदान सोडता येणार नाही,’ असा निर्धारही सामनामध्ये व्यक्त करण्यात आला.