वाई : सातारा पालिकेचे कामकाज निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालते का, असा खोचक सवाल करत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेत नियोजनशून्य कारभार सुरू असल्याचा आरोप सातारा विकास आघाडीवर केला. सातारा पालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की खासदार उदयनराजे भोसले यांनी विकास कामे तातडीने सुरू करा, अशी सूचना केली आहे. निवडणुका आल्या की कामे करायची आणि निवडणुका गेल्या की कामे थांबवून ठेवायची असा प्रकार चालला आहे. सातारा विकास आघाडीचा नियोजनशून्य कारभार सुरू आहे. साताऱ्यात पाणीकपात सुरू असून लोकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. मुळात हे रस्ते सातारकरांसाठी होतात की ठेकेदारांसाठी होत आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हद्दवाढीतील भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची पालिकेने उधळपट्टी केल्यास आम्ही राज्य सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करू अशा इशाराही त्यांनी दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर पालिकेची निवडणूक स्थगित झाली आणि खासदार उदयनराजे गायब झाले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन कामे तातडीने करा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंच्या सातारा पालिकेचे कामकाज हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालते का, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. केवळ टक्केवारी गोळा करणे, कमिशन आणि घंटागाडय़ाचे हप्ते या तीन विषयांकडे सातारा विकास आघाडीचे लक्ष आहे. पैसे गोळा करायचे हाच त्यांचा उद्योग आहे. सध्या घंटागाडीची टेंडर प्रक्रिया सुरू असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.