किल्ले रायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा हजारो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध गडावरून आणलेल्या पाण्याने तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज शहाजीराजे तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समूह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे आदी मान्यवर व देशभरातून लाखो शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शिवभक्तांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, रायगडावरील शिवराज्याभिषेकाला देशभरातून शिवभक्त येऊ लागले आहेत. गडावर लाखो शिवभक्तांची उपस्थिती म्हणजे हा सोहळा लोकोत्सव झाला असून आता राष्ट्रीय सण झाला पाहिजे .
नुकतेच सेवानिवृत्त झालेले कोकण महसूल आयुक्त तथा किल्ले रायगड संवर्धनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर देशमुख यांनी या मार्गदर्शन करताना सांगितले की, रायगड किल्ला हा तमाम देशवासीयांचा आत्मा असून या किल्ल्याच्या संवर्धनाकरिता शासनाने ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून संवर्धनाचे काम सुरू आहे. शिवसमाधीचा डोंब दुरुस्त करण्यात आला असून किल्ल्यावरील तलावांची स्वच्छता करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची त्यांनी माहिती दिली. या संवर्धन आराखडय़ामध्ये परिसरातील गावांचा विकास आराखडादेखील तयार केल्याचे ते म्हणाले. शासनामार्फत रायगड किल्ला संवर्धनाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याद्वारे रायगडचे शिवकालीन वैभव पुन्हा जोमाने उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचंड जल्लोषात शिवराज्याभिषेकाचा लोकोत्सव रायगड किल्ल्यावर साजरा झाला. यात ढोल, ताशे यांचा गजर तसेच पारंपरिक पद्धतीने वेषपरिधान केलेले शिवभक्त आदींचा उत्साह होता. पहाटे ५ वाजता शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. नगरखान्यासमोर ध्वजारोहण करण्यात आले. शाहिरी कार्यक्रम मोठय़ा जल्लोषात झाले. तसेच विविध मर्दानी खेळ, दांडपट्टा यांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.