मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार घटनाबाह्य ठरवण्यासह अन्य बाबींना आव्हान देणाऱ्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. उद्या ११ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने तेच मूळ पक्ष होऊ शकतात का? नसल्यास ते अपात्र ठरणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर उद्याच्या सुनावणीवर अवलंबून आहेत.

उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेला सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- “संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत”, दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

माध्यमांशी बोलतना राऊत यांनी म्हटलं की, “कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, कुणावर कसे दबाव सुरू आहेत. कायद्याची कशी पायमल्ली सुरू आहे. देशात लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न मिनिटा-मिनिटाला होतोय. पण उद्या अकरा तारीख आहे. सर्वोच्च न्यायालयामधील महत्त्वाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही, हे उद्याच्या निकालावरून कळेल,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा- “बंडखोरीसाठी ५० कोटी घेतले”; राऊतांच्या आरोपाला अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेना पक्षाला लागलेल्या गळतीबाबत बोलताना ते म्हणाले की, “मातोश्रीवर दररोज १५-१५ तास बैठका सुरू आहेत. शिवसेनेतला प्रत्येक विभाग आणि जिल्ह्यातील कार्यकारणी मातोश्रीवर येत आहे. आम्ही त्यांना भेटत आहोत, चर्चा करत आहोत. शिवसेना जागेवरच आहे. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता आहे तिथेच आहे. कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आमच्यासाठी आई आहे. आम्ही आईसोबत गद्दारी करू शकत नाही, बेईमानी करू शकत नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसोबत मातोश्रीचं जे नातं आहे, ते अतूट आहे. त्याला कुणीही तोडू शकत नाही,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.