लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. इच्छूक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून मुंबई-दिल्ली वाऱ्या करत आहेत. महाराष्ट्रातही काही मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागली आहे. सातारा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमित शाहांना गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्लीदरबारी जाऊन बसले आहेत. सलग तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असतानाही अमित शाह यांनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही. अशातच आता भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्याच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. भाजपाने मला याठिकाणी संधी द्यावी, अशी मागणीच त्यांनी केली आहे.

काय म्हणाले नरेंद्र पाटील?

सातारा लोकसभेबाबत नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात छत्रपती उदयनराजेंसमोर लढायला कुणीच उमेदवार तयार नव्हता. पण भाजपाने मला शिवसेनेत जाऊन निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मी शिवसेनेतून निवडणूक लढलो आणि मला साडे चार लाखांच्यावर मते मिळाली. छत्रपती उदयनराजेंनाही तेवढ्याच प्रमाणात मते मिळाली होती. आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त ३० ते ३५ हजारांचा फरक होता.”

शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, “आजही माझा दावा आहे की, भाजपाने कमळ या चिन्हावर सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला द्यावी. माझं ग्रामीण भागात चांगलं काम आहे. कार्यकर्त्यांसाठी मी संबंध महाराष्ट्रात फिरत असतो. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे, त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी. त्यामुळे माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंग्रशेखर बावनकुळे मला संधी देतील, अशी आशा आहे.”

उदयनराजेंनी जरा सबुरीनं घ्यावं

“खासदार उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. मात्र त्यांना भेट मिळत नाही, हे ऐकून मलाही खूप वाईट वाटलं. एकाबाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो, दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहेत. अशावेळी त्यांना जर भेट मिळत नसेल तर त्यांनी हा पेच समजून घ्यायला हवा. उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे होते. महायुतीमध्ये लढत असताना अजित पवार गट आणि भाजपाने सातारा लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करायला हवा”, असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.

उदयनराजे-अमित शाह भेट अद्याप नाही, उमेदवारी उदयनराजेंनाच मिळण्याबाबत कार्यकर्त्यांना विश्वास

उदयनराजेंना सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची असली तरी भाजपाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, असे दिसते. साताऱ्यात त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रदेश भाजपा नेत्यांच्या हाती नसल्याने उदयनराजेंनी थेट दिल्ली गाठली. ते राजे असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांना तातडीने भेट देतील, अशी त्यांची अपेक्षा असावी. मात्र अमित शाह यांनी त्यांना तीन दिवस ताटकळत ठेवलं आहे. दिल्लीतील निवासस्थानी शाहांच्या निरोपाची वाट पाहण्याखेरीज राजेंना काहीही करता आलेले नाही. उदयनराजे राज्यसभेतील खासदार असून त्यांच्याकडे खासदारकीची आणखी दोन वर्ष आहेत.