राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं असताना अनिल देशमुखांनी मात्र आपण प्रत्य७ चौकशीसाठी हजर राहू शकत नाही सांगितलं आहे. आपण जबाब ऑनलाईन देण्याची आपली तयार अससल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं असून तसं पत्र ईडीला पाठवलं आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुखांनी सवलत देऊ नये अशी विनंतीच ईडीकडे केली आहे.

“अनिल देशमुखांना आता करोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता करोना?,” अशी विचारणा अंजली दमानिया यांनी ट्वीट करत केली आहे. “ईडीने बिलकुल अपवाद करू नये. सर्वांसाठी कायदा समान असला पाहिजे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा?,” असंही त्या म्हणाल्या आहेत.

“…म्हणून मी हजर होऊ शकत नाही” अनिल देशमुखांनी ईडीचं समन्स टाळत केली विनंती

“भाजपाची ही चाल आहे, पण तुमचे हातदेखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं म्हणत यावेळी त्यांनी देशमुखांसोबत भाजपावरही निशाणा साधला आहे.

देशमुखांनी पत्रात काय म्हटलं आहे

मंगळवारी ईडीला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी लिहिले की, “मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. २५ जूनला जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही व मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.”

ईडीने त्याच्यांसंदर्भात दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाची (ईसीआयआर) प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचे देशमुख म्हणाले आहेत. ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक स्वरुपातील उपस्थिती राहावे लागेल असे स्पष्ट केलेलं नाही असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

बार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी संस्थेच्या नावे – ईडी

मुंबईतील बार मालकांकडून लाच म्हणून उकळलेल्या रक्कमेतील चार कोटी १७ रुपये देशमुख यांनी नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेत वळविल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला होता. ही रक्कम देणगी स्वरुपात प्राप्त झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी दिल्लीतील दोन व्यक्तींना देशमुख यांचे चिरंजीव ऋषीकेश यांनी नागपूरहून रोख रक्कम पाठवली. या दोन व्यक्तींनी ही रक्कम देशमुख अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेच्या खात्यांवर जमा केली, असंही ईडीने न्यायालयात सांगितले .या संशयास्पद आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत ईडीने देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना गेल्या आठवडय़ात अटक केली होती.

परमबीर सिंह यांच्या पत्राने उडाली होती खळबळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. “मुंबईतील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता. या पत्रानंतर झालेल्या उडालेल्या गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सीबीआय आणि नंतर ईडीनं त्यांच्या घरांवर छापे टाकल्यामुळे टाकले होते.