सोलापूर : माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात नीरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात सहा नागरिक अडकले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकडीने धाव घेऊन बाधित नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले. दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेल्या एका साधूसह तिघेजण गावात पूर आल्याने मंदिरात अडकले होते. त्यांचीही सुटका करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक पोहोचले आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

माळशिरस तालुक्यातील कुरबावी नीरा नदीच्या पुरात अडकलेल्यांमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश होता. इंदापूर-भिगवण परिसरात पहाटे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी आली होती. या तुकडीला कुरबावी येथील नीरा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या सहा जणांना वाचविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार ही तुकडी पहाटे तेथे पोहोचली. थोड्याच वेळात सर्व नागरिकांची सुटका करण्यात आली. दरम्यान, या गावातील ३० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेल्या एका साधूसह तिघेजण पाणी वाढल्याने मंदिरात अडकून पडले होते. त्याची माहिती गावच्या सरपंचांना मिळताच बचाव कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार बचाव कार्य करण्यात आले. यावेळी मंदिरातील एका कुत्र्यालाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

उजनीचा पाणीसाठा १० टीएमसीने वाढला

भीमा खोरे तथा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला होत आहे. अवघ्या सहा दिवसांत धरणात सुमारे १० टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २१ मे रोजी धरणात एकूण पाणीसाठा ५१ टीएमसी होता त्यात गेल्या पाच दिवसांत वाढ होत तो ६१.१२ टीएमसीवर गेला आहे. सध्या धरणात दौंड येथून १९ हजार ३२८ क्युसेक विसर्गाने पाणी मिसळत आहे. धरण एकदोन दिवसांत उपयुक्त पातळीत येण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यानिमित्ताने मे महिन्यातील प्रखर उन्हाळ्यातही प्रथमच उजनी धरण भरू लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.