Angar Nagar Panchayat Election 2024 Balraje Patil : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी ३ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. यात भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनवरोधत झाली आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज पडताळणीत राष्टवादीच्या उज्ज्वला थिटे यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही नसल्यामुळे आक्षेप घेतला गेला. याप्रकरणी चौकशीअंती उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवला असल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. दरम्यान, अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी केवळ भाजपाच्या १७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. हे सर्व बिनविरोध झाले आहेत. भाजपाचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. त्यानंतर राजन पाटील यांच्या कुटुंबियांनी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला.
आमदार राजन पाटलांच्या पुत्राचं अजित पवारांना आव्हान
अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या आव्हानामुळे येथील बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला ब्रेक लागला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला धिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. बाळराजे पाटलांचा अजित पवारांना त्वेषाने आव्हान देतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सोलापूरच्या राजकारणात या व्हिडीओची बरीच चर्चा होत आहे.
“अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.”
नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बाळराजे पाटील एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून जल्लोष करत होते. त्याचवेळी ते कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.”
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाच्या सर्व उमेदवारांविरोधात कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे हे सर्व उमेदवार बिनविरोध झाले आहे. केवळ नगराध्यपदाची निवडणूक होईल असं दिसत होतं. मात्र, उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने व अपक्ष उमेदवाराचं फार मोठं आव्हान नसल्याने राजन पाटलांच्या सुनबाई ही निवडणूक जिंकू शकतील असं बोललं जात आहे. तसेच राजन पाटलांचं अनगरवरचं वर्चस्व कायम असल्याचं बोललं जात आहे.
