आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं नवाब मलिक यांना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी २३ फेब्रुवारीला अटक केली होती.

नवाब मलिक अटकेत का आहेत?
दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळलं होतं. त्यानुसार ‘ईडी’ने अटकेची कारवाई केली होती.

२३ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडी कार्याललायत नेण्यात आलं होतं. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली होती.

मलिकांवर आरोप काय?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.