मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. “बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची कमान देण्यात आली होती. राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडली. पण त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला. मग जर तुम्ही बाळासाहेबांचे नाव घेता तर मग तुम्ही पक्ष असा कसा नेऊ शकता. राज ठाकरेंचेही मतभेद झाले पण त्यांनी पक्ष नाही नेला. मग तुम्ही कसे काय नेऊ शकता?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
“मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्शक आहे. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय असे वाटत आहे. शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील, हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला?”
भाजपाची भारतीय लाँड्री पार्टी झालीये
“छत्रपतींच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहेच. आम्ही संघर्ष करुच. पण मला आश्चर्याचा धक्का बसला आहे की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असताना त्यांनी हा निर्णय कसा काय घेतला? संसदेतही राहुल गांधी यांचे भाषण रेकॉर्ड वरुन काढण्यात आले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट केले जाते. हेच लोक जेव्हा भाजपामध्ये जातात तेव्हा मात्र त्यांना क्लीन चीट दिली जाते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही भारतीय लाँड्री पार्टी झाली आहे”, असेच म्हणावे लागेल.
सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, “या देशामधील सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातलेच हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. न्यायालय, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग कुणाचे तरी गुलाम असल्यासारखे वाटत आहे. या निर्णयाला आम्ही नक्कीच आव्हान देऊ. पण ४० बाजारबुणगे पैशांच्या जोरावर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेऊ शकत असतील तर देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल.”
लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.