Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case: “पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण अतिशय खेदजनक आहे. समाज म्हणून आपल्यासाठी ही लाजिरवाणी घटना आहे. हुंड्याच्या विरोधात देशात फार पूर्वी कायदा झालेला आहे. गुन्हेगार कुणीही असले तरी त्यांना शासन झालेच पाहीजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी त्यात सातत्य ठेवावे. हा सामाजिक विषय असून यात आम्हाला राजकारण करायचे नाही”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

समाज म्हणून आपल्याला काळिमा फासणारी घटना आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकाच घरातील दोनही सुना जर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत असतील तर एवढे शिक्षण घेऊन हगवणे कुटुंबाने काय केले? असा प्रश्न निर्माण होतो. पाश्चिमात्य कपडे घालूनही बुरसटलेले विचार गेलेले नसतील तर शिक्षणाचा तरी काय उपयोग. हगवणेंच्या घरात काही क्रांती घडलीच नाही, असे वाटते. पुरोगामी विचारांचा अपमान हगवणे कुटुंबाने केला आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

एका महिन्यापूर्वी मला आमंत्रण होते

हगवणे कुटुंब हे माझ्याच लोकसभा मतदारसंघात मोडते. एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरातील एका कार्यक्रमाचे आमंत्रण त्यांनी मला दिले होते. मात्र घरातील सुनांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली असल्याची माहिती मला होती, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाणे टाळले, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही गेले नव्हते. ते काही वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाला नक्कीच गेले होते. पण तेव्हा हगवणे कुटुंबाबाबतची माहिती त्यांना नसावी, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

संतोष देशमुखप्रमाणे हे प्रकरण माध्यमानी लावून धरावे

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी माध्यमांनी शौर्य दाखवत ती बातमी लावून धरली होती. म्हणूनच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरळीत होऊ शकला. त्याप्रमाणेच याही प्रकरणात माध्यमांनी वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण लावून धरावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. महाराष्ट्र सरकारनेही कडक कारवाई करून कोणत्याही कुटुंबाची सुनेला त्रास देण्याची हिंमत व्हायला नको, असेही त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवीचे बाळ त्या संस्कारात वाढायला नको

वैष्णवीच्या मृत्यूनंतर गेले सहा दिवस तिच्या बाळाचे हाल झाले, अशी माहिती आता समोर येत आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातल्यानंतर आज ते बाळ वैष्णवीच्या कुटुबांकडे सुपूर्द करण्यात आले. बाळाचा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळावा लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. हगवणे कुटुंबिय तुरुंगात आहेत, काही सदस्य फरार आहेत. अशा वातावरणात मुल ठेवायची कुणाचीच हिंमत होणार नाही. त्यामुळे त्या बाळाची देखभाल आजी-आजोबांनी घेतलेली चांगली. कायदा आपले काम करेल. पण आम्ही माणुसकीच्या नात्याने आम्ही यात लक्ष घालू, असेही त्या म्हणाल्या.