“भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले”, असा मोठा दावा ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

“दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. हा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से यांचा खुलासा धक्कादायक आहे”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> “शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं होतं, आणि…” जॅक डोर्सींचे गंभीर आरोप

“सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर त्या व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॅक डोर्सी नेमकं काय म्हणाले?

जॅक डोर्सी यांनी ब्रेकिंग पॉईंट या युट्यूब चॅनेलला सोमवारी मुलाखत दिली. या मुलाखतीत जॅक डोर्सींना शक्तीशाली लोकांविषयी प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांनी भारताचं नाव घेतलं नाही पण या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, “शेतकरी आंदोलना दरम्यानआम्हाला धमक्या देण्यात आल्या होत्या. जगभरातील अनेक शक्तीशाली लोक तुमच्याकडे येतात. विविध प्रकारच्या मागण्या करतात. मी उदाहरण देईन ते भारताचंच. भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरूहोतं तेव्हा आमच्याकडे बऱ्याच मागण्या आल्या. काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. त्यांच्याविषयीच्या या मागण्या होत्या. एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. तसं केलं नसतं तर आमची कार्यालयं बंद करण्यात आली असती, तसंच कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. हे भारतात घडलं आहे. जो एक लोकशाही देश आहे,” असंही डोर्सी यांनी म्हटलं आहे. प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.