Supriya sule on Hagawane Family Dowry case : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्याला हादरवलं होतं. अजूनही या प्रकरणाची बरीच चर्चा चालू आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी तिच्या सासरकडच्या मंडळींकडून (सासू, पती, दिर, नणंद व सासरा) छळ होत होता हे आतापर्यंतच्या तपासांत समोर आलं आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते. तसेच वैष्णवीचा पती व दिर देखील या पक्षासाठी काम करत होते. परिणामी हगवणे कुटुंबामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल बरीच चर्चा झाली. दरम्यान, आता या कुटुंबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा चालू आहे. या मेळाव्यात भाषण करताना पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हगवणे कुटुंब हे सुसंस्कृत व काँग्रेसच्या विचाराचं होतं. मात्र, आता या कुटुंबाची काय स्थिती झाली आहे. या शिकलेल्या कुटुंबाने काय केलंय बघा. आपल्याला असा महाराष्ट्र नको आहे. त्यामुळे राज्यात सामाजिक सुधारणा करण्याची आवश्यकता असून ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी आहे. आपण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामाजिक सुधारणा घडवून आणायला हवी”.
सुप्रिया सुळे राज्यव्यापी दौरा करणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात काम केलं पाहिजे. मी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे. मला वाटतं की राज्याची स्थिती खूप गंभीर आहे. हगवणे प्रकरण त्याचंच एक उदाहरण आहे”.
“त्या हगवणे कुटुंबाचं काय झालंय बघा”
खासदार सुळे म्हणाल्या, “या हगवणे कुटुंबाला मी अनेक वर्षांपासून ओळखते. माझ्या लोकसभा मतदारसंघात तीन निवडणुकांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे. हे हगवणे कुटुंब पाच दशकांपसून शरद पवारांबरोबर आहे. हे सुसंस्कृत असं काँग्रेसच्या विचारांचं कुटुंब आहे. ते एक शिकलेलं कुटुंब आहे. पण, आज त्या कुटुंबाचं काय झालंय? त्यांची सून हुंड्यामुळे आत्महत्या करते. आपल्याला असा माहाराष्ट्र नको आहे.
“आपल्याला हुंडामुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आपल्याला हुंडामुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. केवळ सत्तेत जायचं हे एवढंच आपलं लक्ष्य असता कामा नये. त्यामुळे चला, सर्वांनी निर्णय घ्या, आजपासून पूर्ण ताकदीने लोकांसाठी काम करू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा आपला पक्ष पूर्ण ताकदीने सामाजिक प्रश्नांसाठी काम करेल, असा निर्धार करुया”.