मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनानंतर अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचा आणि संवेदनशीलतेचा काहीही संबंध नसून पराभवाच्या भीतीनेच त्यांनी माघार घेतली, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Andheri by-election : भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“भाजपाने माघार घेतली कारण भाजपाला पराभव दिसत होता. सर्वच एजन्सींनी या पोटनिवडणुकीत भाजपा पराभूत होईल, असे सांगितले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेणे हा भाजपाकडून लावण्यात आलेला हा मुलामा आहे. भाजपाला जर संवेदनशील राजकारण आणि संस्कृती कशी जपायची हे माहिती असतं तर कोल्हापूर किंवा पंढरपूरच्या निवडणुकीत त्यांनी उमेवार दिला नसता”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

“भाजपाने या पोटनिवडणुकीतून माघार घेताना राज ठाकरे यांच्या पत्राचं कारण पुढं केलं आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपावर खरचं होत असेल किंवा भाजपा त्यांचे ऐकत असेल, तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना महाशक्तीने परत बोलवावे, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांनी लिहावं”, असेही त्या म्हणाल्या.