महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख केला. यावेळी सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी परखड शब्दांत टीका केली. सुषमा अंधारेंनी संत ज्ञानेश्वरांविषयी केलेल्या विधानावरूनही सत्ताधाऱ्यांनी मोठं रान उठवलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी सुषमा अंधारेंच्या विधानांचा समाचार घेतानाच विरोधकांवर टीका केली होती. यावरून आता सुषमा अंधारेंनीच देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. अंधारेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमधून फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारेंनी आपल्या ट्वीटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यामधील एक मजकूर ट्वीट केला आहे. यामध्ये “देवेंद्रभाऊ, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि सावरकरांचा निषेध कोणत्या भाषेत नोंदवणार आहात, तेही कळवा. मी आपली प्रतिक्रिया ऐकायला उत्सुक आहे”, असं अंधारेंनी म्हटलं आहे.

काय आहे ट्वीट केलेल्या मजकुरात?

या उताऱ्यामध्ये सावरकरांनी संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला आहे.”ज्ञानेश्वर रेड्याच्या मुखे वेद बोलवू शकले, पण रामदेवराजा अल्लाउद्दीन तुझ्यावर चालून येतो आहे बघ म्हणून टपालवाल्यालाही जी सूचना देता आली असती, ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वत:च्या तोंडून रामदेवरावास देता आली नाही. ज्ञानदेव निर्जीव भिंत चालवू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालवून विंध्याद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत”, असा उल्लेख या मजकुरात दिसत आहे.

Video: “हिंदू धर्म आहे हे आम्ही मानायलाच तयार नाही”, नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट करत सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला!

दरम्यान, यापुढच्या ट्वीटमध्ये सुषमा अंधारेंनी संभाजी भिडेंच्या एका वक्तव्याचाही संदर्भ दिला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांपेक्षा मनू श्रेष्ठ होता’, असं विधान संभाजी भिडेंनी केल्याच्या बातमीचा एक फोटो सुषमा अंधारेंनी ट्वीट केला आहे. “देवेंद्रभाऊ, मनू विषमतावादी व्यवस्थेचा व वर्णव्यवस्थेचा, जातीव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. तो माउली तुकोबारायांपेक्षा श्रेष्ठ कसा असू शकतो? हा संभाजी भिडेने केलेला अपमान नव्हे का? पण भाऊ, तुम्ही तर भिडेंना क्लीन चिट दिली!”, असंही सुषमा अंधारेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“भाऊ, शेवटचे दोनच प्रश्न…”

“माझ्या प्रश्नांची उत्ततरं द्यायची सोडून तेरा वर्षं मागे जाऊन उत्खनन का केलं आणि करायचं उत्खनन तर तेरा वर्षं वाट का बघितली? की तेव्हा मी शिवसेनेत नव्हते, म्हणून भीती वाटली नाही? शेवटचा प्रश्न.. बहिणीवर इतकं कुणी चिडतं का भाऊ? अशाने चिडका बिब्बा नाव पडेल बरं”, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.