मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडत आपला वेगळा गट स्थापन केला आणि राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन केले. गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेवर ताबा मिळवण्यावरुन न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर लढाई सुरु आहे. त्यातच आता थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाचे काय होणार? असा एक घटनात्मक पेच देखील निर्माण झाला आहे. ही आक्रमकता हा शिवसेना आणि शिवसैनिकांचा मूळ पिंड आहे. या आक्रमकतेला साजेशे नेतृत्व हवे म्हणून मुंबईतील गिरगाव येथे तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीबाबतचे बॅनर लागले आहेत. यामुळे अनेक चर्चांना पेव फुटले आहे.

म्हणून आम्ही बॅनर लावले, शिवसैनिकांची भावना

गिरगावचे शाखाप्रमुख निलेश (बाळा) अहिरेकर आणि उपविभाग संघटक विशाल सागवेकर यांनी हे बॅनर लावले आहेत. “आजची शांतता… उद्याचं वादळ…! नवा लक्षात ठेवा…” अशा आशयाचे बॅनर लावण्यामागे त्यांची नेमकी भावना काय आहे हे लोकसत्ताने त्यांच्याशी संपर्क साधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निलेश अहिरेकर म्हणाले, “स्व. बाळासाहेब यांची छबी आम्हाला तेजस ठाकरे यांच्यात दिसते. स्वतः बाळासाहेब म्हणाले होते की, तेजस माझ्यासारखाच आहे. तरुणांचा देखील तेजस ठाकरे यांच्याकडे कल आहे. त्यांच्याबद्दल तरुणांच्या मनात आकर्षण आहे. त्यामुळे तेजस यांनी लवकर राजकारणात यावे, अशी आमची भावना आहे.”

हे ही वाचा >> गुंतवणूक आणण्यासाठी गुजरात जाणार दावोसला, शिंदे-फडणवीस मात्र मुंबईतच मोदींच्या स्वागताला; संजय राऊतांची टीका

आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आधीच राजकारणात आलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाबाबत विचारले असता शिवसैनिक म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचे व्हिजन जबरदस्त आहेच. त्यांची प्रशासकीय काम करण्याची पद्धत, जनतेची कामे मार्गी लावण्याती हातोटी एकदम वेगळी आहे. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व देखील आम्हाला भावते. मात्र तरिही प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. तेजस ठाकरे शिवसेनेत सक्रीय झाल्यास त्यांच्या निव्वळ असण्याने आम्हाला हुरुप येईल आणि युवा शिवसैनिकांचा जोष वाढेल, असे निलेश यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.