एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले तसेच शिवसेना पक्षदेखील खिळखिळा झाला. पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तथा उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात सक्रिय होऊ शकतात असे म्हटले जात आहे. दरम्यान, तेजस ठाकरे खरंच राजकारणात येणार का? या प्रश्नाचे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. तेजस ठाकरे राजकारणात येणार नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे १५ दिवसांत देणार होते राजीनामा, पण नारायण राणेंमुळे फिसकले; दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट

“तेजस ठाकरे राजकारणात येणार ही चर्चा बातम्यांमधूनच केली जात आहे. या चर्चेवर विश्वास ठेवू नका. त्याला यायचे असेल तर तो सांगेन. कोणीतरी अफवा पसरवतं आणि याच अफवेला पुढे नेलं जातं. हे चुकीचं आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा >>> “माझ्यासमोर ज्या याचिका…” शिंदे गट-उद्धव ठाकरेंतील संघर्षावर विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाल्यामुळे आमदार, खासदारांसह स्थानिक कार्यकर्तेदेखील दोन गटांत विभागले गेले आहेत. त्यामुळे पक्षात तसेच कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेऊन पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.