मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं आहे. सध्या मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण स्थगित केलं असलं तरीही त्यांनी आरक्षणासाठीचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर, दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरता आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरता आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास्थळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांच्यावतीने सरकारला जाब विचारला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र दिव्य दुःखी भावनांना सामोरे गेले आहे. मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण रडायला लागले. तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या, मला बघून रडू येतंय. परिस्थिती हाताळत असल्याने याला कोणतंही राजकीय वळण लागू नये. फक्त वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकते आणि ते सरकारसमोर मांडण्याचा शब्द देते. धनंजय भाऊ कृषी मंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे सरकारला तिथे जाऊन सांगण्याची गरज नाही. मी त्यांना इथंच सांगते.”
हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”
ओबीसी समाजाच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत
“माझी मागणी सर्वात महत्त्वाची आहे. आज माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं अशी विनंती आहे. आंदोलन देशात कुणीही करु शकतं. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून येथे आलेले नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, असंही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.
आज वडीगोद्री येथे उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे पाच दिवस झाले उपोषण करत आहेत.
कालपासून त्यांनी पाणी देखील त्यागले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा धीर देण्यासाठी मी गेले. सरकारमधील… pic.twitter.com/nA70jFJP4ZThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 17, 2024
सरकारने या दोघांचंही उपोषण सोडवावं
“लक्ष्मण हाके यांनी आज पाणी सोडलं आहे. चेहरे टवटवीत आहे, कारण संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. डोंगर, कपाऱ्यात जाऊन जीवन बनवणारा हा माझा वंचित समाज आहे. या समाजाचा काय आवाज आहे, तो आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजवून सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं. ज्याप्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याच प्रमाणे यांचं उपोषण सोडवलं जावं”, असं आवाहनही पंकजा मुंडेंनी सरकारला केलं आहे.