संजीव कुळकर्णी नांदेड : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नांदेडमध्ये संयुक्त जाहीर सभेचा प्रस्ताव दिला होता. पण तो बारगळला असून काँग्रेसने लक्ष केंद्रित केलेल्या हिंगोली मतदारसंघात स्वतंत्र जाहीर सभेची आखणी करत ठाकरे गटाने काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे चित्र समोर आले. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या हिंगोलीतील २७ ऑगस्टच्या सभेची गुरुवारी घोषणा केल्यानंतर हिंगोलीच्या जागेवरून वरील दोन पक्षांमध्ये ताणाताणी होणार, हे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात नांदेड-हिंगोली व परभणी दौऱ्यावर येणार होते, पण त्यांच्या या दौऱ्याच्या काही दिवसआधी चव्हाण व ठाकरे यांची मुंबईत भेट झाली होती. या भेटीत चव्हाण यांनी ठाकरे यांच्याशी नांदेडमधील संयुक्त सभेसंबंधी चर्चा केली होती. या चर्चेनंतर ठाकरे यांनी आपला दौरा लांबणीवर टाकला, पण नंतर चर्चेची पुढची फेरी होण्यापूर्वीच ठाकरे गटाने २७ ऑगस्टच्या हिंगोलीच्या सभेची घोषणा मुंबईहून केली आणि नांदेडचा संयुक्त सभेचा विषय बाजूला ठेवला. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत हिंगोलीची जागा शिवसेनेने विक्रमी मताधिक्याने जिंकली होती. गेल्या वर्षी या पक्षात मोठी फूट पडल्यानंतर पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांनी आधी उद्धव यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली, पण नंतर ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. १९९० नंतर शिवसेनेने या मतदारसंघात पाच वेळा विजय मिळवला असल्याने आगामी निवडणुकीत तेथे आपला उमेदवार उभा करण्याची ठाकरे गटाची योजना असल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. हिंगोलीची जागा लढविण्यासंदर्भात तसेच तेथे सक्षम उमेदवार देण्यासंदर्भात काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. पण ही जागा आम्हीच लढविणार, असे सेनेच्या संपर्कप्रमुखांनी दीड महिन्यापूर्वी स्पष्ट केले होते. आता या पक्षाचे पाऊल त्या दिशेने पडले आहे.