पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हरियाणातील मुलींची उंची वाढली, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. तर, कोविडची लस मोदींनी बनवली होती, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत केला होता. भाजपा नेत्यांच्या या दोन्ही वाक्यावरून ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात असा दावा करण्यात आला आहे.
“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. अलीकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. धनखड बोलत असताना त्या मंचावर गृहमंत्री अमित शहा, हरयाणाचे मुख्यमंत्री मनहर खट्टर वगैरे तालेवार मंडळी उपस्थित होती. भारतीय जनता पक्षाने ‘अंधभक्त’ नावाची एक मानवी जमात नव्याने निर्माण केली आहे. त्यांचा विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी काहीच संबंध नाही. मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळाले आहे”, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
..तर तुमचे हिंदुत्त्व लखलाभ
“ज्या देशाचे पंतप्रधान गटाराच्या नाल्यातून ‘गॅस’ निर्माण करण्याची भाषा करतात व अंधभक्त माना डोलावतात, त्या देशाने आधुनिकतेची कास सोडून पुन्हा बाबा आदमच्या जमान्याचा मार्ग निवडलेला दिसतो. मध्य प्रदेशातील एक बाबा धीरेंद्र शास्त्री की कोणी हा भाजपच्या प्रचाराचा झेंडा घेऊन फिरतो आहे. या बाबाची वक्तव्येही अशीच जुनाट वळणाची. हेच जर तुमचे हिंदुत्व असेल तर ते तुमचे तुम्हालाच लखलाभ ठरो”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
आसुरी शक्ती निर्माण होतात…
“मोदी युगात अशा बुवाबाजीस महत्त्व मिळाले. कारण अशा विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे. मोदी युगात बेरोजगारी, महागाई वाढली. प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या त्यांच्या घोषणा हवेत विरल्या. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, आरोग्य, शिक्षण महागले. त्यात आता मोदी काळात महिलांची उंची वाढल्याचे तारे तोडले गेले. जर महिलांची उंची वाढली असेल तर मग गगनाला भिडलेल्या महागाईची, बेरोजगारीची उंची का कमी होऊ नये? मणिपुरात हिंसाचाराची आग भडकली आहे. त्या आगीवर शांततेचे पाणी ओतण्याची उंची मोदी सरकारने का गाठू नये? मोदी युगात भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने टोकाची उंची गाठली. महिलांच्या उंचीपेक्षा या भ्रष्टाचाराची उंची दाहक आहे. चीन लडाखच्या सीमा पार करून आमच्या हद्दीत घुसला, पण एक इंच जमिनीवरही पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा अद्यापि आपल्या राज्यकर्त्यांनी ठामपणे घेतल्याचे दिसत नाही. भारताला तोडण्याचे आसुरी शक्तींचे प्रयत्न आहेत असा हल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला, पण या देशात भागवत वगैरेंच्या विचारांचे वारस असलेले सरकार व पंतप्रधान आहेत. तरीही अशा आसुरी शक्ती निर्माण होतात व आव्हान उभे करतात हे आश्चर्यच आहे”, असाही टोला ठाकरे गटाने लगावला.
“मोदी यांची ख्याती विश्वाचे नेते अशी आहे, पण स्वदेशात मात्र आसुरी शक्ती देश तोडायला निघाल्या आहेत. सर्वसाधारणपणे विज्ञान आणि धर्म हे परस्परविरोधी आहेत. कोविडवरील लस पंतप्रधान मोदी यांनी शोधून काढली असे भाजपचे नेते सांगतात व अंधभक्त त्यावर टाळ्या वाजवतात. हा त्यांचा नवीन धर्म. त्यात संशोधक, विज्ञानास स्थान दिसत नाही. गाय ही माता नसून एक उपयुक्त पशू आहे हा वीर सावरकरांचा विचार. मोदी युगात वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत, पण त्यांना वीर सावरकरांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करायचा आहे. वीर सावरकरांच्या अखंड हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत फक्त पाकड्यांच्या ताब्यातील भूभाग नव्हता, तर अफगाणिस्तान, चीनने घेतलेला भूभागही आहे याचा भाजपवाल्यांना सोयिस्कररीत्या विसर पडतो”, असा निशाणाही साधला.
विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा …
“आता मोदी युगात मुलींची उंची वाढली असा ‘शोध’ भाजपच्या मंडळींनी लावला. हे विज्ञान आहे की अंधश्रद्धा? यापेक्षा मोदी युगात देशाच्या जनतेची प्रतिष्ठा, मानवी हक्क, संविधान, लोकशाहीची उंची किती वाढली याचे मोजमाप होणे खरे म्हणजे गरजेचे आहे. हिंदू धर्म हा संकुचित नाही, पण मोदी युगात हिंदुत्व कमालीचे संकुचित व भयग्रस्त झाल्याचे दिसत आहे. खरं तर हिंदू धर्म हा एकमेव धर्म असा आहे की, जो विज्ञानाशी सुसंगत दिसतो. हिंदू धर्म हा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मवाद यांचा मिलाफ आहे. धर्म आणि धर्मांधता यात फरक केला पाहिजे. हिंदुत्व हे आता धर्मांधता व बुरसटलेल्या विचारांकडे ढकलले जात असेल तर ते सगळ्यात धोकादायक आहे. कोविडची ‘लस’ मोदींनी बनवली, हरयाणातील मुलींची उंची मोदी सत्तेत आल्यामुळे वाढली अशा प्रकारचे ‘बोल’ हे मेंदूचा ताबा अंधश्रद्धा व अंधभक्तीने घेतल्याचा परिणाम आहे. देशातील सर्व प्रमुख संशोधन, वैज्ञानिक, तांत्रिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबा घेतला व या संस्थांच्या मोक्याच्या जागी संघ विचारांची माणसे बसवली. जेव्हा विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते व वेगळ्या प्रकारची फॅसिस्ट राजवट सुरू होते. मोदींमुळे मुलींची उंची वाढली हा विचार त्याच राजवटीतून निर्माण झाला. नेहरूंनी देशाला विज्ञान व संशोधनात उंच नेऊन ठेवले. त्या उंचीवरून देश खाली घसरताना दिसत आहे!”, असे टीकास्त्रही सोडण्यात आले.