रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील १५ गाव आणि एकूण ३६६ कुटुंबांना पावसाळ्यात दरडीचा व पुराचा धोका निर्माण झाला आहे. या सर्वच गावांना जिल्हा प्रशासनामार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यामध्ये या गावांचा व कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासन पावसाळ्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेता ‘अलर्ट मोड’वर आले आहे. मागीलवर्षीप्रमाणे कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. यावर्षी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करताना २००५ व २०२१ मध्ये सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
या समितीने तसेच कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधीक्षक अभियंत्यांना पूरपरिस्थितीमध्ये जनरेशन कशाप्रकारे करावे, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत कामकाज चालणार आहे. त्यामुळे चिपळूणच्यादृष्टीने हा निर्णय तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.
तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये पेढे, परशुराम घाट, तिवरे (गावठाणवाडी, फणसवाडी), तिवडी (उगवतवाडी), पेढांबे (रिंगी धनगरवाडी), येगाव, कामथे खुर्द, कापसाळ, गोवळकोट, मिरजोळी, कळकवणे, आकले, कोळकेवाडी, पोफळी, कळंबट व वीर आदी ठिकाणी दरडींचा धोका आहे. एखाद्या गावात आपत्कालीन घटना घडल्यास तेथील शाळांमध्ये निवाराकेंद्र स्थापन केले जाणार आहेत.