राजापूर – गणेशोत्सवादरम्यान गोवंश वाहतूक आणि कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी पहाटे रायपाटण येथे धडक कारवाई करत दोन वाहनांमधून १९ गोवंशाची अवैध वाहतूक करताना तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये सुमारे २० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १९ जनावरांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरिक्षक ओगले, सहाय्यक पोलीस फौजदार गोरे, पोलीस हवालदार पालकर, राजवैद्य, कदम, सवाईराम, शेट्ये, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना ओणी ते पाचल मार्गे गोवंश वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी रायपाटण येथे शुक्रवारी पहाटे ३.३० वा. वाहनांची तपासणी सुरू केली. पहाटे ५.५५ मिनिटानी पोलिसांनी संशयावरून महिंद्रा कंपनीची जिनीओ मॉडेलची (एमएच-०४-एपी-६४२४) आणि पाठोपाठ आयशर प्रो-१०५९ मॉडेलची (एमएच-०७-एक्स-१५११) ही दोन वाहने थांबवली. तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये बांधलेली एकूण १९ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. तसेच, पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून जनावरांची तपासणी केली नव्हती.
याप्रकरणी चालक विनायक मनोहर भोईटे (वय ३८, रा. पांगरी, निपाणी, जि. बेळगावी, कर्नाटक) आणि समीर बाळासो मुजावर (वय ३१, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी ही जनावरे तबरेज चांदनियॉ ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्याकडून आणल्याचे कबूल केले. या प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.