बरं झालं पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले. इतके दिवस आम्ही या गद्दारांनाच हिरे समजून पैलू पाडण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र काही उपयोग झाला नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अद्वय हिरे यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं शिवबंधन हातावर बांधलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी छोटेखानी भाषण केलं. तसंच अन्नाची शपथ घेणाऱ्यांनीही गद्दारी केली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आम्ही दगडांनाच हिरे समजत होतो आम्ही काही जणांना हिरे म्हणून नाचवत राहिलो. दगडांनाच हिरे समजत होतो, मात्र दगड गेले, बुडाले आणि बुडणार आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एखाद्या पक्षावर विरोधी पक्षाने घाला घातला तर भाग वेगळा. मात्र आपला एकेकाळचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाचं कसं काम चालतं हे अद्वय यांनीच सांगितलं. आम्ही २५ ते ३० वर्षे भोगलं आहे. त्यांनासुद्धाही पालखीत बसवून आम्ही मिरवणुका काढल्या. पण पालखीत बसवल्यावर त्यांना वाटायला लागलं की आपण कायमचे भोइ आहोत. शिवसेना प्रमुखांनी भाजपाची पालखी वाहून नेण्यासाठी नाही तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. राजकारणाच्या बाबतीत राज्यात किळसवाणा प्रकार राजकारणाच्या बाबतीत राज्यात किळसवाणा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तरूणांमध्ये संभ्रम आहे. त्यांना वाटतं आहे की राजकारण घाणेरडं आहे का? मी सांगतो आहे की कुठलंही क्षेत्र घाणेरडं नसतं. त्या क्षेत्रातली माणसं हे त्या क्षेत्राला चांगलं किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशात जो घाणेरडा आणि किळसवाणा पायंडा भाजपाने पाडला आहे. तो पायंडा गाडून टाकायचा आहे असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. अन्नाची शपथ घेणारेही तिकडे गेले गद्दार लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी जगत आहेत. त्यांना माणुसकी राहिलेली. वापरा आणि फेका अशी वृत्ती आहे. काही जणांनी अन्नाची शपथ घेतली आणि गद्दारी केली. आता अन्नाची शपथही खरी घेतली नसेल तर काय बोलणार? असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच आपण लवकरच मालेगावात सभा घेणार आहोत असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे.