राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपानं यावरून ठाकरे गटावर टीका करायला सुरुवात केली असताना आता उद्धव ठाकरेंनी या टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात केलेल्या विधानाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी एकार कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाचा उल्लेख करून त्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. “सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी काँग्रेसविरोधात काम केलं”, असा दावा राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना केला. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही अशा..”

“मला आनंद वाटला की देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा उपस्थित केला. मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय, की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात नितांत आदर, प्रेम आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसू शकणार नाही. पण सावरकरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा? ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही, अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“त्यांना स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलायचा अधिकार नाही”

“ते म्हणतील तुम्ही कुठे होतात तेव्हा? आम्ही तेव्हा नव्हतोच. पण ज्यांना आता एक-दोन वर्षांत १०० वर्ष होणार आहेत, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेव्हा होता. पण स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना तो अधिकार नाही. सावरकरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, ते स्वातंत्र्य धोक्यात आल्यानंतर ते अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. म्हणून हा पाचकळपणा त्यांनी आता बंद करावा. आधी आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान काय आहे, ते सांगावं. आणि मग आम्हाला प्रश्न विचारावेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं आहे.

“सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं हाच…”, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला; शिंदे गटालाही केलं लक्ष्य!

“देवेंद्र फडणवीसांचा वारसा कोणता?”

बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदेच आहेत, या फडणवीसांच्या विधानाचाही उद्धव टाकरेंनी समाचार घेतला. “आधी देवेंद्र फडणवीसांचा वारसा कोणता, हेही एकदा बघावं. कारण आता सगळ्यांचा डीएनए एक म्हणतायत. पण त्यांचा राजकारणातला डीएनए नेमका कोणता हे शोधावा लागेल. कारण त्यांना सगळेच आदर्श त्यांचे वाटतायत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ला घडलेल्या घडामोडींचा आपण बदला घेतला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला लगावला. “म्हणूनच दिल्लीतल्यांना वाटलं की मुख्यमंत्री बदला आणि यांना उपमुख्यमंत्री करा. दिल्लीतल्यांनीही हा फडणवीसांचा बदलाच घेतला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.