शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज (१४ मार्च ) कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची गुहागरमध्ये जाहिर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा नेते नारायण राणे, यांच्यासह शिवसेना शिंदे गटावर टीका केली. "विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती", असा टोला उद्धव ठाकरे यांनी मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. तर याच सभेत भास्कर जाधव यांचे कौतुक करत "तुम्ही एकटे नाहीत, संपूर्ण पक्ष तुमच्या सोबत आहे", असा धीरही दिला. "भाजपाचे हिंदुत्व नासलेले हिंदुत्व आहे", असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला. भास्कर जाधव यांच्याबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले? दोन दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. "महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात आपल्याला मंत्रिपद मिळायला हवे होते. पण मिळाले नाही. पक्ष फुटल्यानंतर गटनेते करायला हवे होते, पण केले नाही", अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. यानंतर भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा रंगली. आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत भाष्य केले. "भास्कर जाधव तुम्ही एकटे नाहीत, सर्व शिवसेना तुमच्या पाठिशी आहे", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना धीर दिला. हेही वाचा : रणजी ट्रॉफी मुंबईचीच! विदर्भला नमवत रहाणेच्या शिलेदारांनी ८ वर्षांनी पटकावले जेतेपद भाडोत्री जनता पक्षाने आपले सरकार पाडले… "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा मी मुख्यमंत्री झालो. तेव्हा मी काय काम केले, ते तुमच्यासमोर आहे. मी महाराष्ट्रासाठी काम करत होतो. पण या भाडोत्री जनता पक्षाने आपले सरकार गद्दारी करून पाडायला सांगितले. बरं जे गद्दार गेले, त्यांच्या पोराबाळांना मी विचारतो, तुम्हाला काय कमी दिले होते? मंत्रीपदे दिले, आमदारकी, खासदारकी दिली?", असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाची भोकं पडलेली हे तीनपाट. "गेल्या निवडणुकीत विनायक राऊत यांना कोकणातील जनतेने निवडून दिले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती", असा टोला उद्धव ठाकरेंनी मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना लगावला. तसेच "भास्कर जाधव आणि सर्वांना सांगतो, त्यांच्या (राणे यांच्या) शिवीगाळीला, शिवीगाळीने उत्तर देऊ नका. कारण हे भाजपाचे नासलेले आणि कुजलेले हिंदुत्व आहे. यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत, पण त्यांच्या हिंदुत्वांमध्ये शिव्या आहेत. भाजपाची भोकं पडलेली हे तीनपाट आम्हाला शिव्या देतात. पण ते जसा उल्लेख करतात, तसा एकही शिवसैनिक उल्लेख करणार नाही", असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "मी अनेकदा सांगितले की, मला स्वत: ला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. आपल्या देशातील बाकीचे पक्ष पाहिले तर त्यांचा नेता आधी मुख्यमंत्री होतो. असे असेल तर मी अनपेक्षित पणे मुख्यमंत्री झालो असेल तर काय चुकलं? मग ज्या घराने तुम्हाला पोसले, त्यांनाच अशी गद्दारी करून पाडायचे? तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कोणाच्या पाठित वार केला, जर शिवसेनेची चार अक्षरे तुमच्या पाठीवर लागली नसती तर कोणीही तुम्हाला विचारले नसते", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.