कराड : शिवसेनेचे नेतृत्व हे दुसऱ्याला दबावाखाली ठेवणारे (प्रेशर देणारे) असते. पण, चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरेच आज दबावाखाली असल्याचा टोला राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. विधिमंडळातील आमचे सहकारी संजय शिरसाठ यांनी केलेले वक्तव्य पाहता आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंकेस वाव असल्याचे ते म्हणाले.

दौलतनगर-पाटण येथे ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी उद्धव ठाकरे तणावाखाली असल्याचे वक्तव्य केल्यासंदर्भात मंत्री देसाई म्हणाले, भास्करराव जाधवांना तसा अनुभव आला असावा. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम स्वतःकडे नेतृत्व ठेवत जे हवे होते ते त्यांनी ‘महायुती’कडून करून घेतले होते. पण, आज त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे कोणाच्यातरी दबावाखाली राहतात आणि वागतातही, हे त्यांचे सहकारीच म्हणत असल्याने त्याचा विचार त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शिवसैनिकांना करावा लागेल, असे शंभूराजेंनी सुचवले.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकार करणार मोठी कारवाई; आदिती तटकरे म्हणाल्या, “कोणत्याच…”

‘महायुती’त असताना उद्धव ठाकरे यांचा दबाव सहकारी पक्षांवर असायचा. आता ‘महायुती’ला सोडून ते चुकीच्या लोकांच्या संगतीत असल्याने उद्धव ठाकरे यांना कोणाच्यातरी दबावाखाली राहावे लागत असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

दिघेंच्या मृत्यूबाबत शंकेस वाव

आनंद दिघे यांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात त्याबाबत शंका होती. काही तासांतच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाणार होते. परंतु, अचानक त्यांचा मृत्यू झाल्यासंदर्भात आमचे विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाठ यांनी केलेले वक्तव्य पाहता आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत शंका घ्यायला वाव असल्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा – Supriya Sule : “दीड ते दोन महिन्यांत आपल्याच विचारांचं सरकार…”, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो अजित पवारांच्या बदनामीचा प्रयत्न

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला पैसे देवूनही आणि दादा लाल होवूनही लोक येत नसल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता शंभूराज म्हणाले, अजित पवार हे राजकीय व्यक्तिमत्व आणि त्यांची कारकीर्द पाहिल्यास एक स्पष्टवक्ता नेता अशी त्यांची ओळख. त्यांच्या सभांना नेहमीच आणि आजही गर्दी असतेच. त्यांच्यावर पैसे वाटून लोकांना सभेला आणण्याची वेळ कधीही येणार नाही. अपुरी माहिती आणि केवळ अजित पवारांच्या बदनामीसाठी जितेंद्र आव्हाडांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.