लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : गतवर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे संपूर्ण क्षमतेने भरलेल्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा काल संपुष्टात आला. गतवर्षी तो जानेवारीतच संपुष्टात आला होता. योग्य नियोजन असते, तर हा पाणीसाठा आणखी काही दिवस टिकवता आला असता. सध्या धरणातील पाणीसाठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असले, तरीही येत्या दोन महिन्यांत उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा आणखी खालावण्याची शक्यता आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणाची एकूण क्षमता ११७ टीएमसी इतकी असून, त्याशिवाय अतिरिक्त ६ टीएमसी पाणी साठवता येते. एकूण पाणीसाठ्यापैकी ५४ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त, तर उर्वरित ६३ टीएमसी पाणीसाठा मृत म्हणजे उणे पातळीत मानला जातो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊसमानामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १२३ टीएमसीपर्यंत भरले होते. त्याच्या अगोदर म्हणजे २०२३ साली कमी पावसामुळे धरणात जेमतेम ६० टक्के इतकाच पाणीसाठा झाला होता. त्या आणीबाणीच्या काळातही पाणीवाटपाचे अपेक्षित काटकसरीचे नियोजन न झाल्याने जानेवारी २०२४ मध्ये धरण उणे पातळीत आले होते. त्यानंतर जादा पाणी वापरामुळे धरणातील पाणीसाठा जून २०२४ मध्ये मागील ४४ वर्षांत प्रथमच उणे ६० टक्क्यांपर्यंत खालावला होता.

त्यानंतर सुदैवाने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झालेल्या समाधानकारक पावसामुळे उजनी धरण संपूर्ण क्षमतेने भरले होते. पुढे ठरल्याप्रमाणे शेती सिंचनासह सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीकाठावरील गावांची तहान भागवण्यासाठी धरणातून आवर्तन सोडण्यात आले. मात्र, वारेमाप पाणी उपसा झाल्यामुळे अवघ्या काही महिन्यांत धरणातील ५४ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा फस्त झाला आहे.

उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर १४ औद्योगिक वसाहतींसह सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील ५४ साखर कारखाने, वीजनिर्मिती केंद्रे, सिनारमास सारखे कागदनिर्मिती प्रकल्प, अनेक खासगी व सहकारी पाणीपुरवठा संस्था चालतात. परंतु त्यांचे भवितव्य आता पाण्याअभावी अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांतच मोठा पाणीसाठा फस्त

उजनी धरणातून सोलापूरसह अन्य शहरांना पिण्यासाठी सोडले जाणारे पाणी बंद जलवाहिनीद्वारे नव्हे, तर अजूनही भीमा नदीवाटे सोडले जाते. यातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होतो. दुसरीकडे शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने होत नाही. त्यामुळे धरणातील ५४ टीएमसी पाणीसाठा अवघ्या काही महिन्यांतच संपला आहे.