सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेल्या आणि सोलापूरकरांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या १७० एमएलडी क्षमतेची उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजना रडत रखडत अखेर पूर्ण झाली असून, तिची चाचणी यशस्वी झाली आहे. योजनेमुळे सोलापूरकरांना आठवड्यातून किमान दोन वेळा पाणीपुरवठा होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
सोलापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओंबासे यांनी ११० किलोमीटर लांबीच्या पूर्ण झालेल्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजनेची पाहणी केली. उजनी धरणावरील पंप हाऊस, दुहेरी जलवाहिनी, पाणीउपसा यंत्रसामग्री, जॅकवेल व इतर कामांचीही पाहणी डॉ. ओंबासे यांनी केली. या वेळी पंपगृहातील सर्व सहा पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली.
उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी उजनी जलाशयावर उभारलेल्या नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेच्या एका पंपातून सोलापूरपर्यंत किती वेळेत आणि किती एमएलडी पाणी पोहोचते, याचीही चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पंप सुरू करण्यात येतील. पंपाची अंतिम चाचणी लवकरच करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सांगितले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजनेचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, योजनेचे कंत्राटदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रंगा राव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.