कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. कर्जमाफीची गरज नसून शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. विरोधक फक्त कर्जमाफीची मागणी करतात, आम्हीदेखील विरोधात असताना हीच मागणी करायचो अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी कात्री पत्रकारांना आमंत्रित केले होते. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना गडकरी यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारण्यात आला. विरोधक कर्जमाफीची मागणी करत असताना तुमची भूमिका काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर गडकरी म्हणाले, कर्जमाफीने प्रश्न सुटत नाही. याआधीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांचा प्रश्न काही सुटला नाही. विरोधक नेहमीच कर्जमाफीची मागणी करतात, आम्हीदेखील विरोधी बाकांवर असताना ही मागणी करायचो अशी कबुलीही त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काळजी घेत आहे असे त्यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली होती. खासदार राजू शेट्टी यांनीदेखील कर्जमाफीसाठी आत्मक्लेश यात्रा काढली. उद्योजकांना कर्जमाफ करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफ का करत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता. विरोधकांकडून दबाव वाढत असतानाच शेतकऱ्यांनीही संपावर जाण्याचा पवित्रा घेतला होता. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या योजनेची घोषणा लवकरच घोषणा केली जाणार आहे. तसे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमधील शेतकऱ्यांना दिले होते. ३१ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे घाईघाईने काही घोषणा न करता, कर्जमुक्तीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींने हे विधान केले आहे.