धाराशिव : तीर्थक्षेत्र तुळजापूर स्थित श्रीतुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या विशेष बैठकीत तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.मंदिर परिसरातील असंयुक्तीक बांधकाम हटवून मंदिराला पूर्वीचे वैभवशाली स्वरूप देण्याच्या दृष्टीने हे पावले उचलण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्था सुधारण्याबरोबरच गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

संरचनात्मक लेखा परिक्षण व वैज्ञानिक चाचण्या

संरचनात्मक लेखापरिक्षण व वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या आहे. मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरिक्षण करण्यात आले आहे. हे लेखापरिक्षण विशेषज्ञ व्यक्तींकडून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आले आहे. यामध्ये पुढील बाबी आढळून आल्या. मंदिराच्या मुख्य गाभार्‍यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ व कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले. १९९३ च्या भूकंपानंतर मंदिराच्या शिखराचे बळकटीकरण करण्यात आले होते. मात्र, त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेत तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे.

बोरोस्कोपी चाचणीतून मंदिरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या बांधकाम साहित्यांची तपासणी करण्यात येणार आहे. क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भगृह आणि शिखराच्या आतल्या भागातील लपलेले तडे आणि नुकसान समोर येणार आहे. चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिराच्या गाभार्‍याचे व शिखराचे पूर्णपणे दुरुस्ती करावी का, याचा निर्णय प्रशासनाच्या सहमतीने घेतला जाणार आहे. त्यानुसार नव्याने अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराचे संरचनात्मक लेखापरीक्षण सीओईपी पुणे संस्थेच्या सहाय्याने केले जात असून, त्यानुसार पुढील काम हाती घेतले जाणार आहे.

भाविकांसाठी अधिक सुविधा मिळाव्यात ही बाब लक्षात घेऊन मंदिरात येणार्‍या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश व निर्गमन मार्ग वेगळे करण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच, भाविकांना पुरेशी जागा मिळावी आणि चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळल्या जाव्यात, यासाठी मंदिर परिसरातील अनावश्यक बांधकामे हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. श्रीतुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक पावले उचलण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूळ स्थापत्य शैलीचे जतन

मंदिराच्या मूळ स्थापत्य शैलीचे जतन करताना भाविकांची सुरक्षा आणि ऐतिहासिक वारशाचे रक्षण या दोन्ही बाबींचा विचार शासनाने केला आहे. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे मंदिराचे ऐतिहासिक महत्व जपले जाईल, तसेच भाविकांना सुरक्षित आणि सुबक दर्शन अनुभवता येणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वाहने यांनी दिली.