धरण लगतच्या क्षेत्रावर पाणीटंचाईचे सावट
मुरुड तालुक्यातील विहूर धरणातील पाण्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. त्यामुळे धरणालगतच्या परिसरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाळा संपायला अजून दोन महिने शिल्लक असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिकच उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी गत सध्या मुरुड तालुक्यातील विहूर आणि त्या लगतच्या परिसरातील लोकांची झाली आहे.
गावजवळ भलेमोठे धरण आहे, पण नळाला दोन-दोन दिवस पाणी येत नाही. धरणात पाणीसाठा शिल्लक राहत नाही. जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने या धरणाची निर्मिती केली. मात्र निर्मितीपासूनच हे धरण समस्यांच्या गाळात रुतले आहे. कधी धरणाचा व्हॉल लिक झाल्याने, तर कधी दुरुस्ती कामात झालेल्या घोळामुळे हे धरण वादातीत राहिले.
धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर आजवर जिल्हा परिषदेने करोडो रुपये खर्च केले आहेत. पण उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी समस्या काही सुटलेली नाही. २०१२-२०१३ मध्ये धरणाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी तब्बल ५ कोटी १७ लाख रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र धरणाच्या दुरुस्ती कामासाठी तसेच पाणीपुरवठा योजनेवर मोठा खर्च होऊनही त्याचा उपयोग झालेला नाही.
आज धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा केवळ २० दिवस पुरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. येणाऱ्या काळात ही पाणी समस्या आणखी उग्ररूप धारण करण्याची भीती विहूरचे सरपंच इकरार मोदी यांनी सांगितले. या परिसरात निर्माण झालेली पाणी समस्या लक्षात घेऊन शासनाने पर्यायी पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणीपुरवठा विभागाकडून लवकरच या धरणाची पाहणी केली जाईल, पाणीपुरवठा विभागाचे हे पथक आपला अहवाल सादर करेल.
यानंतर ठेकेदाराला कामातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले जातील, तोवर ठेकेदाराचे उर्वरित बिल दिले जाणार नाही, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.