महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्याकडे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर राज्यातलं शिंदे सरकार कामाला लागलं आहे. ज्या-ज्या मराठा कुटुंबांच्या मागील दोन-तीन पिढ्यांमधल्या कुणबी नोंदी आहेत अशा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र दिलं जात आहे. त्यामुळे या मराठा कुटुंबांचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध केला आहे.

दरम्यान, कुणबी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जरांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी भुजबळांच्या नेतृत्वात जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी नेत्यांची एल्गार सभा पार पडली. काँग्रेसमधील ओबीसी नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेदेखील या एल्गार मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनीही भुजबळांबरोबर एल्गार सभेत भाषण केलं. परंतु, या सभेनंतर विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांवर टीका केली आहे.

छगन भुजबळ हे मनोज जरांगेंविरोधात खूप आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंवर ते एकेरी उल्लेख करत तसेच वैयक्तिक टीका करत आहेत. तसेच मनोज जरांगेंच्या आंदोलनावरील भुजबळांनी टीका केली. भुजबळांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोपही केले. भुजबळांच्या या भूमिकेला आपलं समर्थन नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, मी माझी स्वतःची आणि पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाणार आहे. भुजबळांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे विचार वेगळे असून भूमिकाही वेगळ्या आहेत. मी ओबीसींसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ते करत असताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी आमची भूमिका आहे.

हे ही वाचा >> देहूत मनोज जरांगे यांची रॉयल एन्ट्री; तुकोबांचं घेतलं दर्शन, म्हणाले, “या सरकारला….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्याविरोधात आदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपाचा दबाव असल्याचा आरोप होत आहे. यावरही विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवार म्हणाले, अशी चर्चा मीदेखील ऐकली आहे. माझ्या कानावर तो विषय आला आहे. मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे कोणावरही आरोप करण्यापूर्वी मला त्यासंदर्भात थोडी अधिक माहिती घेऊ द्या, त्यानंतर मी यावर बोलेन. नंतर मला वाटलं की यामागे कोणाचे तरी अदृष्य हात आहेत तर मग मी त्याचा पडदा टराटरा फाडल्याशिवाय रहणार नाही.