काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्तेबाबत नुकताच एक मोठा दावा केला आहे. आमचं सरकार येणार नाही, परंतु, मुख्य खुर्चीवरील व्यक्ती बदलेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, यावर स्वतः अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चा मावळल्या. परंतु, आता विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “कधी पुण्यातल्या बैठकीला उपमुख्यमंत्री दांडी मारतात, तर कधी नागपूरमधील बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले तर तिथे मुख्यमंत्री येत नाहीत. यावरून कळतं तिकडे (महायुती) सगळं काही आलबेल नाही. हा सगळा तमाशा महाराष्ट्रातील जनतेला दिसतोय. येत्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. यात मुख्य खुर्चीपासून (मुख्यमंत्रीपद) बदलाला सुरुवात होईल. सप्टेंबर २०२३ हा महिना या राज्यातल्या सत्ताबदलाचा असेल.”

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिरसाट म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, या पदावर (विरोधी पक्षनेते) बसल्यावर प्रत्येकाला विरोधात बोलावं लागतं. विजय वडेट्टीवार तीच भाषा बोलत आहेत. ही भाषा पहिल्यांदा बोलली जात आहे का? तर नाही. पूर्वी पण अशी भाषा वापरली जायची.

हे ही वाचा >> “प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार असतील तर…”, ठाकरे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, एक महिन्यात सरकार पडेल, दोन महिन्यात किंवा सहा महिन्यात सरकार पडेल, असं बोललं जात होतं. काय झालं त्याचं? अशा प्रकारची वक्तव्ये करून आपणही राजकीय प्रवाहात आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी (विजय वडेट्टीवार) सुरू केला आहे. त्यात काही चूक नाही. परंतु, सप्टेंबर महिन्यात सरकार पडेल, ऑक्टोबरमध्ये पडेल अशी स्वप्नं ते पाहत राहतील आणि दुसऱ्या बाजूला सरकार मजबुतीने काम करेल. तसेच येणारी सत्तादेखील शिवसेना भाजपाची असेल, याची विरोधकांना कल्पना आहे.