राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आणायचं असून पुढचा मुख्यमंत्री आपल्याला वसंतदादांच्या विचारांचा हवा आहे, असं विधान सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे. तसेच यासाठी आपल्या सगळ्यांनाच एकत्र होऊन काम करावं लागेल, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आज सांगलीत विशाल पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की घाबरून…”, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

नेमकं काय म्हणाले विशाल पाटील?

“आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत. या राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं आणि वसंतदादांच्या विचारांचं सरकार आणायचं आहे. वसंत दादांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे, सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यासाठी आपल्याला सगळ्यांनाच एक होऊन काम करावं लागेल”, असं विशाल पाटील म्हणाले.

पुढे बोलताना, “माझ्या विजयाबरोबरच सांगलीतला प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेला आहे. मला तुम्ही निवडून दिले आहे. आता तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. याबरोबरच “प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार असून त्यामार्फत आपल्याला काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोहोचवायचा आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला त्रास दिला अन् त्यांची…”; विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. सांगलीत यंदा तिरंगी लढत बघायला मिळाली होती. अपक्ष विशाल पाटील, भाजपचे संजयकाका पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील, यांच्यात मुख्य लढत होती. या निवडणुकीत विशाल पाटील यांना ५ लाख ७१ हजार ६६६ मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांना ४०.३३ टक्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना ५.२० टक्के मते मिळाली होती. सांगलीत यंदा एकूण एकूण ११ लाख ६९ हजार ३२० मतदान झाले होते.