पंढरपूर : संत मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पंढरीच्या विठुरायाच्या पालखीने मंगळवारी मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले. टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत प्रस्थान ठेवण्याता आले. विठुरायाच्या पादुकांचे विधिवत पूजा करण्यात आली. ही पालखी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी विसावली. पुढे मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवणार, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. दरम्यान, संत मुक्ताईचा ७२८ वा अंतर्धान समाधी सोहळा गुरुवार, २२ मे रोजी होणार आहे.

संत मुक्ताईच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी विठुरायाच्या पादुकांनी मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवले आहे. तत्पूर्वी मंगळवारी पहाटे ६ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पादुकांची विधिवत प्रस्थान पूजा करण्यात आली. आरतीनंतर पादुकांचे मुक्ताईनगरकडे प्रस्थान झाले. या वेळी नित्योपचार विभागप्रमुख पांडुरंग बुरांडे , श्री संत मुक्ताई संस्थांचे विश्वस्त पंजाबराव पाटील, संदीप पाटील, संग्राम पाटील, मुक्ताई पालखी सोहळाप्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, भागवत धर्मप्रसारक अध्यक्ष अध्यक्ष सूर्यकांत भिसे, ज्ञानेश्वर हरणे आदी उपस्थित होते. पांडुरंगाच्या पादुका विठ्ठल मंदिरातून मुख्य मंडपात आणण्यात आल्या. विश्वस्त व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी या पादुका पंजाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. या पादुका सभामंडपात ठेवण्यात आलेल्या पालखीमध्ये ठेवल्या. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला व हा सोहळा करमाळ्याकडे मार्गस्थ झाला.
पुढे करमाळ्यात भव्य स्वागत करण्यात आले.

वारकऱ्यांनी येथे न्याहारी केली आणि सकाळी सोहळा अहिल्यानगरकडे मार्गस्थ झाला. दुपारी हा सोहळा श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात पोहोचला. येथे दुपारचा नैवेद्य व वारकऱ्यांना भोजन देण्यात आले. विश्रांतीनंतर सोहळा छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पालखी सोहळ्याचे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. कीर्तन व समाज आरतीनंतर वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. रात्री कीर्तनसेवा झाल्यानंतर सोहळा येथे विसावला. पालखी सोहळ्यामध्ये १०० वारकरी सहभागी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाधी सोहळ्याचे कीर्तन

श्री संत मुक्ताबाईंचा २२ मे रोजी ७२८ वा अंतर्धान समाधी सोहळा आहे. या समाधी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग, माता रुक्मिणी, संत निवृत्तिनाथ, संत नामदेव आदी संत उपस्थित होते असे अभंगात वर्णन केले आहे. याप्रमाणे संत नामदेवांच्या पादुका घेऊन नामदेव महाराजांचे वंशज गेली शेकडो वर्षे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. गुरुवर्य केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांचे येथे समाधी सोहळ्याचे कीर्तन होते.