पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी शिखर बँकेने कारवाई केली. कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली आहेत. राज्य शिखर बँकेकडून विठ्ठल सहकारी कारखान्याने कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही कारावाई करण्यात आली आहे. यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अभिजीत पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत पाटील काय म्हणाले?

“भाजपात प्रवेश करण्यासंदर्भात आज कोणतीही चर्चा झाली नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सध्या सील आहे. त्या संदर्भात सरकारने मदत करावी, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली. कारखान्यावर २०२१ मध्ये जप्तीची कारवाई झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सुरु होतं. मात्र, या प्रकरणाचा स्टे अचानक उठल्यामुळे कारवाई झाली. यातच योगायोग म्हणजे लोकसभा निवडणुका आहेत. कारखान्यासाठी मदत सरकार करु शकते. आपणही सरकारमधील लोकांनाच मदत मागितली पाहिजे”, असे अभिजीत पाटील म्हणाले.

हेही वाचा : “नकली शिवसेनेचा बोलघेवडा नेता पंतप्रधानपदाबाबत म्हणाला…”, नरेंद्र मोदींची संजय राऊतांवर टीका

“तसेच स्वाभाविक आहे की, ते आम्हाला मदत करत आहेत. तर आम्हीही त्यांना मदत केली पाहिजे. शेतकरी सभासदासाठी जे कारावे लागले ते आम्ही करू, असे आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत. यानंतर ते मदतीबाबत लवकरच सांगतील”, असे अभिजीत पाटील म्हणाले. याचवेळी अभिजीत पाटील यांनी कारखाना वाचवायचा असेल तर कुठेही जावं लागेल, असे सूचक विधानही केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजित पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत. ते सध्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. मात्र, ते चेरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील बॅंकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर घडामोडी वाढल्या आहेत. अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत जवळपास एक तास चर्चा केली. त्यामुळे अभिजीत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.