भिवंडीमधील पडघा बोरीवली गाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी गावातील काही संशयितांच्या घरी छापे मारी केली. यात साकिब नाचणच्या घराचीही झडती घेण्यात आली. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकिब नाचण याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती. सोमवारी झालेल्या कारवाईचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. ६३ वर्षीय साकिब नाचणने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र घोषित केल्याचा त्याच्यावर आरोप होत आहे. तसेच भिवंडी आयसीसचा तळ स्थापन केल्याचाही आरोप आहे.
आज पडघा येथे महाराष्ट्र एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने दहशतवादाचा संशय असलेल्या १५ ठिकाणांवर छापे मारी केली. ज्यात नाचणच्या घराचाही समावेश आहे. या कारवाईसाठी २५० पोलीस, ज्यात एटीएसच्या २० पथकांचा समावेश होता.
दहशतवाद आणि पडघा
मुस्लीमबहुल भाग असलेल्या पडघ्यात दहशतवादाच्या विरोधातील ही पहिली कारवाई नाही. आयसिस मॉड्यूलचा भाग असल्याच्या आरोपाखाली मागच्या वर्षी जुलैमध्ये दोन स्थानिक रहिवाशांना अटक करण्यात आली होती. अशाच प्रकारच्या जवळपास डझनभर कारवाया याठिकाणी झालेल्या आहेत.
२०११ च्या लोकसंख्येनुसार पडघ्याची लोकसंख्या सुमारे ५,७८० असून त्यापैकी ८३ टक्के लोक मुस्लीम आहेत. मागच्या दोन दशकांपासून बोरीवली पडघा गाव विविध कारणांसाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेले आहे. २००२-०३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पडघ्यातील पाच रहिवाशांची नावे आरोपी म्हणून पुढे आली होती.
पडघा गावाचा इतिहास
पडघ्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. सातव्या ते दहाव्या शतकात उत्तर आणि दक्षिण कोकणात राज्य केलेल्या शिलाहार राजवटीपासून पडघ्याचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्य चळवळीतही या गावाचे योगदान असल्याचे म्हटले जाते. पडघ्यातील अरूंद गल्ल्या, शतकाहून जुनी घरे आता आयसिसशी संबंध जोडल्यामुळे रडारवर आले आहेत.
१२ व्या शतकात व्यापाराच्या कारणास्तव भिवंडी बंदरावर अरबांचा छोटा समूह याठिकाणी आला. बोरीवली गावात व्यापारी अरबांचा समुदाय स्थायिक झाला, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या लेखात देण्यात आलेली आहे.
पडघा आणि अल – शाम हे प्रकरण काय?
साकिब नाचण याने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केले होते असा तपास यंत्रणांचा संशय आहे. अल – शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सीरिया. त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता, असाही संशय आहे. साकिबने पडघा गावाला ‘अल – शाम’ असे नाव दिले होते. पडघ्यातला तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना पडघ्यात स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता असा दावा एनआयएने केला आहे. देशात विघातक कारवाया करणे, सामाजिक सलोखा भंग करणे आणि भारत सरकारविरोधात लढा पुकारणे अशी योजना या मॉड्यूलच्या माध्यमातून होत होती. यापूर्वी पडघा गावातून एनआयएने ऑगस्ट महिन्यात साकिब याच्या मुलाला अटक केली होती.