कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजाही केली जाते. गेल्यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी पूजा केली होती. परंतु, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. यासंदर्भात काल (३ ऑक्टोबर) समितीची बैठकही झाली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात आज माहिती दिली.

कार्तिकी एकादशीनिमित्ताने ३ ऑक्टोबर रोजी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली. यात्रेनिमित्त नियोजनाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्रींची शासकीय पूजा केली जाणार आहे. परंतु, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने अजित पवार की देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पूजा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत माहिती देताना गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, “२३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या पूजेसाठी येत असतात. या वर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेण्याची चर्चा काल बैठकीत झाली. त्यांचा जो निर्णय येईल त्यानुसार आम्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार आहोत.”

आतापर्यंत कोणी किती वेळा केली पूजा?

दरम्यान, गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शासकीय पूजा झाली होती. आषाढी आणि कार्तिकी महापूजेचा मान मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेता आहेत. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात चारवेळा आषाढी एकादशीचा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला होता. २०१८ मध्ये मराठा आंदोलनामुळे फडणवीसांनी मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातूनच आषाढी एकादशीची महापूजा केली होती. त्यानंतर, २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली. २०२० आणि २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीनिमित्त महापूजेचा मान मिळाला होता. तर, कार्तिकी एकादशीचा मान अजित पवारांना मिळाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, जून २०२२ मध्ये राज्यात अभूतपूर्व असा राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागली, तर त्याजागी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यामुळे गेल्यावर्षीही कार्तिकी एकादशीचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाला होता. त्यामुळे यंदा हा मान कोणाला मिळतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे.