पिण्याचे पाणी हा प्रत्येकाचा हक्क आहे, पण ते मिळत नाही, तो हक्कभंग कोणी केला. डोनेशन न देता शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तो हक्का कोणी हिरावून घेतला. महिलांची अब्रू रस्त्यावर पडते आहे. खुलेपणाने जगणे, हा त्यांचा हक्क आहे, तो हक्कभंग कोणी केला. शेतकरी आत्महत्या करताहेत, जगणे हा त्यांचा हक्क आहे, मग तो हक्क कोणी हिरावला, असे प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी अमरावती येथील जाहीरसभेत सत्ताधाऱयांवर कडाडून हल्ला चढविला. सत्ताधारी राज्यातील प्रत्येकाच्या हक्कांचा भंग करणार आणि विधानसभेत हक्कभंग आणणार, यावर त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱयाच्या तिसऱया टप्प्याचा शेवट रविवारी अमरावती येथील जाहीर सभेने झाला. या सभेत त्यांनी विदर्भातील अपुरे सिंचनप्रकल्प, विधानभवनातील हक्कभंगाचा ठराव, परप्रांतीय कामगार आदी मुद्द्यांना स्पर्श केला.
अपुऱया सिंचनप्रकल्पांबद्दल राज ठाकरे म्हणाले, विदर्भातील गोसीखूर्द प्रकल्पाची मूळ किंमत ३७४ कोटी रुपये होती. आज त्याची किंमत १३ हजार ७४० कोटी रुपये झाली असूनही तो अद्याप पूर्ण झालेला नाही. वर्धा प्रकल्पाची मूळ किंमत ३०३ कोटी रुपये होती. २००९ मध्ये त्याची किंमत १३७४ कोटी रुपये होऊनसुद्धा तो पूर्ण झालेला नाही. नंदूरबारमधील दिघाव प्रकल्पाची मूळ किंमत १९९६ रोजी ६९८ कोटी होती. त्याच प्रकल्पासाठी २०१२ रोजी ४४२५ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला. हे धरण पूर्ण नसताना उपसासिंचनाचे काम सुरू करण्यात आले. ती कामे बांगडिया-शहा या कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली. ६० रुपये दराने प्रतिपाईप घेण्याचा सरकारचा नियम असताना, १४० ते १६० रुपये दराने प्रतिपाईप विकत घेण्यात आले. त्यात सुमारे एक कोटी रुपयांचे पाईप घेऊन ठेवले. सध्या ते धूळ खात पडले आहेत. दरवेळी विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळविल्याचे सांगितले जाते. पण सांगली, सातारा या ठिकाणीही दुष्काळी परिस्थिती आहे. तिथले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जर हा निधी पश्चिम महाराष्ट्रात गेल्याचे सांगितले जाते, तर तिथे दुष्काळ कसा, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी लोकांना जाती जातींमध्ये विभागण्याची शक्यता राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सत्ताधारी निवडणुकीच्यावेळी जातीचे शस्त्र वापरतील. तुमच्यामध्ये आपापसात वाद निर्माण करतील आणि निवडणुकीच्यावेळी जातीवर मतदान मागतील. पण, पुन्हा जातीच्या नावावर मतदान करू नका, नाहीतर परत पश्चाताप करण्याची वेळ येईल, असा सल्ला त्यांनी दिला.
चंद्रपूर आणि गडचिरोली येथे अनेक परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why should this subjects came in parliament wich is meaning less raj thackeray
First published on: 24-03-2013 at 09:13 IST