बॉलिवूडमध्ये रोज नवनवीन चर्चा रंगताना दिसतात. काही वेळा जुन्या चर्चाच नव्याने डोकं वर काढत असतात. यामध्ये अनेक वेळा अभिनेता अभिषेक बच्चन याच्या करिअरविषयी चर्चा रंगताना दिसतात. अनेक वेळा त्याची तुलना बिग बींबरोबर केली जाते. मात्र या तुलनेवरुन अभिषेकने त्याचं मौन सोडलं असून त्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन यांनी आज स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे. एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत गेला. मात्र त्यांच्या मानाने अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करु शकला नाही. अभिषेकचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरत गेले.त्यामुळे अनेक वेळा त्याची अमिताभ यांच्याबरोबर तुलना करण्यात आली.

‘माझी अनेक वेळा माझ्या वडीलांबरोबर अर्थात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तुलना केली जाते. त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरतात. तर माझे चित्रपट सरासरी कमाई करतात. त्यामुळे अनेक वेळा मला ट्रोलही करण्यात येतं. मात्र माझ्या विषयी होणाऱ्या या चर्चांना किंवा तुलनेला मी तुलना समजत नाही. प्रत्येक व्यक्तीचा हा दृष्टीकोन असतो. त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने विचार करुन ट्रोल करत असतात. मात्र एक नक्की अमिताभजी माझे वडील आहेत. त्यामुळे त्यांच्यातील काही गुणही माझ्यात आहेत’, असं अभिषेक म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘माझे चित्रपट अपयशी का ठरतात याचं कारण मला समजलं असतं. तर मी सुरुवातीलाच यशस्वी ठरणाऱ्या चित्रपटांची निवड केली असती. कोणता चित्रपट कधी प्रेक्षकांच्या मनात उतरेल हे सांगता येणं शक्य नसतं. मला फक्त एवढंच माहित आहे की आपलं काम मनापासून आणि पूर्ण मेहनतीने करावं, मग तो चित्रपट यशस्वी ठरो अथवा अपयशी’.

दरम्यान, अभिषेक लवकरच अनुराग कश्यप यांच्या ‘मनमर्जिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून अभिषेक दोन वर्षानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.