जीवनाशी निगडीत व्यक्तिगत गोष्टी खुलेपणाने सोशल मीडियावर शेअर करणे आपल्याला आवडत नसून, आपण सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करत असल्याचे मत बॉलिवूड अभिनेता इरफान खानने व्यक्त केले आहे. डिजिटल आणि वेबवरील प्रेक्षकांची संख्या दिवसांगणिक वाढत असल्याचे आपल्याला जाणवले आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यापासून आणखी दूर राहू शकत नाही. मी संतुलितपणे सोशल मीडियावर सक्रिय असून, मी जीवनातील सर्व गोष्टी खुलेपणाने येथे शेअर केलेल्या नाहीत. परंतु हा एक असा मंच आहे जिथे प्रेक्षकदेखील सक्रीय आहेत, असे मी मानतो. वेबवर शो बघणाऱ्यांशी स्वत:ला जोडण्याचा हा उत्तम मार्ग असल्याचे इरफान पुढे म्हणाला. 'नेटफ्लिक्स'वर प्रसारित झालेल्या 'टोकीयो ट्रायल'मध्ये अभिनय करणाऱ्या इरफानने 'हिंदी मीडियम' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'फिल्टर कॉपी' ('पॉकेट एसेस'चा यूट्युबवरील मनोरंजन चॅनल)वरील 'नो मोअर जनरेशन गॅप'मध्ये अभिनय केला आहे. देशातील डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव पाहून अचंबित आणि रोमांचित झालेल्या इरफानला पुन्हा वेब मालिकेत अभिनय करण्याची इच्छा आहे. टॅलेंट कुठुनही समोर येऊ शकते. अनेकांनी वेब मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली असल्याचे इरफान म्हणतो. वेब कलाकारांनी हिंमत दाखवावी, चांगल्या कथांची निवड करावी, सर्वसाधारण काम करू नये आणि नेहमी उत्तम मनोरंजनासाठीचा प्रयत्न करावा, असा सल्लादेखील देण्यास तो विसरला नाही. 'बाहुबली'सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटात संपूर्ण देशातील मनोरंजन क्षेत्रातील व्यापारावर कब्जा मिळविण्याची क्षमता असल्याने, हिंदी चित्रपटाला मुळात उत्तम विषयासोबत येण्याची गरज इरफानने व्यक्त केली. हिंदी चित्रपटाने चांगल्या कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, असे संकेतदेखील त्याने दिले. 'हिंदी मीडियम' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी तो बोलत होता. हिंदी माध्यमाच्या शिक्षकांसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते. 'हिंदी मीडियम' हा चित्रपट देशातील वाढत्या इंग्रजीच्या वापरावर भाष्य करतो.