बॉलिवूड अभिनेत्रीं अभिनयाबरोबर या इण्डस्ट्रीशी निगडीत विवध क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवत आहेत. दीपिका, प्रियांकासारख्या अभिनेत्री निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत.  कंगनानं देखील ‘मणिकर्णिका’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आता अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला देखील दिग्दर्शनाच्या क्षेत्रात यायचं आहे.

एका मुलाखतीत ऐश्वर्यानं दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येण्याचा आपला मानस बोलून दाखवला आहे. ‘मला दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवायचं आहे. मला चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं आहे. अजूनही मी माझं लक्ष यावर पूर्णपणे केंद्रीत केलेलं नाही. मात्र या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आता आली आहे’ असं म्हणत तिनं दिग्दर्शन क्षेत्रात येण्याचा आपला विचार बोलून दाखवला आहे.

‘फन्ने खान’ या चित्रपटात ऐर्श्वया दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्यानं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. आराध्याच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ दिल्यानंतर ती पुन्हा एकदा या क्षेत्रात रुजू झाली होती. तिनं ‘जज्बा’, ‘सरबजित’ सारखे चित्रपटही केले मात्र हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाही. त्यामुळे ऐश्वर्यानं नवीन काहीतरी करू दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ऐश्वर्या ‘गुलाबजामून’ या चित्रपटात दिसणार होती. मात्र काही कारणानं तिनं हा चित्रपट नाकारला. त्यानंतर संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात ती दिसणार अशीही चर्चा होती. साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये ती झळकणार होती मात्र आता ऐश्वर्याऐवजी दीपिका आणि तापसी पन्नू या दोघींच्या नावाची चर्चा आहे.