भारतीय चित्रपट पुरस्कारांना विरोध केला जाणे किंवा त्यावर प्रश्न उभा करणे ही आता काही नवी गोष्ट नाही. अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कंगना रणौत यांसारख्या मोठ्या कलाकारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. आमिरने तर काही वर्षांपूर्वीच पुरस्कार स्वीकारणे बंद केले आहे. आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटीचे नाव जोडले गेले आहे. संगीत दिग्दर्शक अमाल मलिक याने फेसबुक पोस्टद्वारे चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्ये होत असलेल्या पक्षपातीपणावर राग व्यक्त केला आहे. अमालने पुरस्कार सोहळ्यांबाबत नाराजी दर्शवत त्यांचे परिक्षण करणा-या परिक्षकांनाही सोडले नाही. अशा प्रकाराच्या पुरस्कारांचे परिक्षक राहणा-यांना त्याने पक्षपाती असे म्हटले आहे. अमालने कोणत्याही पुरस्काराचे नाव न घेता आणि आपल्याला नॉमिनेट करणा-यांना धन्यवाद म्हणत पोस्टमध्ये लिहिले की, बागी चित्रपटासाठी मला नामांकित केल्याची लाज वाटते आहे. या वक्तव्यामुळे कदाचित माझे दिग्दर्शक आणि निर्माता यांना माझा राग येईल. मात्र, तो अतिशय सरासरी अल्बम होता. मी इथे काही माझं स्वतःचं रडगाणं गात नाहीये. यंदाच्या सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये मला कमीत कमी दोन नामांकन मिळालेली आहेत, पण हे खरंच विलक्षण आहे. तुम्ही सर्वेक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की 'ऐ दिल है मुश्किल', 'दंगल', 'सुलतान', 'कपूर अॅण्ड सन्स', 'बार बार देखो', 'एअरलिफ्ट' आणि 'सनम रे' या चित्रपटांच्या गाण्याला लोकांनी पसंती दिली आहे. याचसह अमालने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-यांच्या पुरस्कारावरही भाष्य केले. केवळ स्टार किड्स असल्यामुळे सर्वोत्कृष्ट पदार्पण म्हणून कलाकारांच्या मुलांना पुरस्कार दिला जातो. यातून, अमालने नकळत अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धन कपूर याच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धनने गेल्यावर्षी 'मिर्झ्या' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. पुरस्कार सोहळ्यांमध्ये परिक्षकांची पसंती (ज्युरी अवॉर्ड) हे पुरस्कारही दिले जातात. परिक्षकांची पसंती विभागात दिल्या जाणा-या पुरस्कारावरही अमालने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 'सरबजीत चित्रपटाकरिता ऐश्वर्या राय बच्चनला नामांकन मिळते. त्याच चित्रपटात रणदीप हुड्डाने मुख्य भूमिका साकारली होती. 'सरबजीत'साठी जीवाचे रान करणा-या रणदीप हुड्डाला वगळून ऐश्वर्याला नामांकन दिले गेले. तसेच, धोनीवरील बायोपिककरिता नीरज पांडे किंवा 'एअरलिफ्ट'करिता राजा मेनन यांना नामांकित का केले गेले नाही, असेही अमालने त्याचा पोस्टमधून विचारले. कोणत्याही कलाकाराला पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळणे, हे त्याने केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती असते. पण, चित्रपटसृष्टीत चांगले संगीत, चित्रपट आणि उत्तम काम करणा-यांकडे आपण दुर्लक्ष करत चाललो आहोत. एखाद्याला नामांकन न देऊन आपण त्याचा अनादर करत आहोत, असे वाटत नाही का? पुरस्कार जिंकणे किंवा न जिंकणे याने काहीच फरक पडत नाही. मुद्दा हा आहे की, 'जब तक', 'कौन तुझे',' बेसबरिया', 'सब तेरा' आणि 'बोल दो ना जरा' यांसारखी हिट गाणी देऊनही अरमान मलिकला त्याच्या कामासाठी नामांकितही केले जात नाही. विशेष म्हणजे हे मी त्याचा भाऊ असल्यामुळे बोलतोय असे नाही, असेही अमाल म्हणाला. आपण नवीन कलाकारांचे आणि टॅलेण्टचे स्वागत करायला हवे, त्यांच्या कामाचा पुरस्कार करायला हवा. पण, जर तुम्ही चांगल्या कामाला नामांकित केले नाही तर ते अजून चांगले काम करण्यसाठी प्रेरित होणार नाहीत, असेही अमालने म्हटले.