राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. श्रीनिवासने ‘लोकसत्ता’शी बोलताना आनंद व्यक्त करीत दिग्दर्शकांसह संपूर्ण टीमचे आभार मानले. श्रीनिवास म्हणाला, उत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे सायंकाळी मला कळले, अनेक जण फोनवरून अभिनंदन करीत आहेत. ‘नाळ’चे दिग्दर्शक सुधाकर रेड्डींसह चित्रपटातील कलावंतांनी आपले कौतुक केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मला छान वाटत आहे. श्रीनिवास पोकळे हा येथील यशोदा नगर परिसरातील साक्षरा इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. त्याचे वडील गणेश पोकळे हे दस्तूरनगर भागात राहतात. गणेश पोकळे यांनीही या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘नाळ’मधील श्रीनिवासने साकारलेली चैत्याची भूमिका गाजली. त्याच्या अभिनयाची अनेक दिग्गज कलावंतांनी प्रशंसा केली. आता तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होतो आहे. तो सध्या एका चित्रपटात काम करतो आहे, पण त्याने सोबतच अभ्यासावरही लक्ष केंद्रित केले आहे, असे गणेश पोकळे यांनी सांगितले. श्रीनिवासची ‘नाळ’ चित्रपटासाठी निवड झाली, तेव्हा तो इयत्ता दुसरीत शिकत होता. चित्रपटाचे दिग्दर्शक चैत्याच्या भूमिकेसाठी एका खोडकर मुलाच्या शोधात होते. चित्रपट वऱ्हाडी बोलीभाषेतला असल्याने या भागातीलच लहान मुलगा हवा, असे चित्रपटाच्या चमूचे म्हणणे होते. श्रीनिवास हा त्यावेळी अमरावतीच्या द्वारकानाथ अरोरा इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये शिकत होता. त्याला पाहताच तो नाळच्या चमूला भूमिकेसाठी साजेसा वाटला. श्रीनिवासची निवड झाली. त्याच्या कुटुंबीयांची, शाळेची परवानगी घेतल्यानंतर चमू श्रीनिवासला पंधरा दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी पुणे येथे घेऊन गेली. वऱ्हाडी बोलीतील त्याचे संवाद श्रीनिवासने आत्मसात केले. त्याच्या सहज अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. त्याच्या अभिनयावर आता राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली आहे. श्रीनिवासला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे कळाले, तेव्हा तो नातेवाईकांकडे नागपूर येथे होता. ५६व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात देखील त्याला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले होते.