बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. २०१७ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. अनुष्काने लग्न केले तेव्हा तिचे वय फक्त २९ वर्ष होते. बॉलिवूड अभिनेत्रींसाठी हे वय खूप कमी मानले जाते. नुकतंच 'फिल्मफेयर'ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचे कारण उलगडले. ती म्हणाली की, "मला असं वाटतं, बॉलिवूडचा प्रेक्षक खूप समजूतदार आहे. कलाकाराला स्क्रीनवर बघण्यातच त्यांची आवड आहे. तुमचं लग्न झालं आहे की नाही किंवा तुम्हांला मुलं आहेत की नाही याने त्यांना काही फरक पडत नाही. आपल्याला या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. एका अभिनेत्रींसाठी २९ हे लग्नासाठी कदाचित कमी वय असेल पण, मी लग्न केले कारण मी प्रेमात होते आणि आहे." ती पुढे म्हणाली की, "लग्न तर करायचेच होते. मी नेहमीच महिलांशी समान व्यवहार करावा या मताची आहे. जर अभिनेते लग्नाआधी फार विचार न करता त्यांचं काम सुरु ठेवतात तर, महिलांनीच का विचार करावा? मला आनंद आहे की, आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्न केले आहे." भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी लंडनला पोहोचली होती. दरम्यान, अनुष्काच्या वेगवेगळ्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.