२०१९ वर्षानं निरोप घेतला आहे. पण या वर्षाबरोबरच आणखी मोठी गोष्ट इतिहासात बंद होणार आहे. एकविसाव्या शतकातील दुसरं दशकही या वर्षाबरोबर सरणार आहे. या दशकात अनेक घटना घडल्या. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पटल या दशकात ढवळून निघालं. चित्रपट सृष्टीतही अनेक प्रयोग झाले. नव्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा पडद्यावर आल्या. अशातीलच काही सिनेमांनी आपला ठसा मावळत्या दशकात उमटवला. या सिनेमाचा घेतलेला आढावा. बॅण्ड बाजा बारात (२०१०) रॉकेट सिंगच्या अपयशानंतर यश राज बॅनरने भारतीय पद्धतीनं होणाऱ्या लग्नाच्या विरूद्ध टोकाची एक प्रेमकथा पडद्यावर आणली. या सिनेमानं प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, त्याचबरोबर एक नव्या जोडीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगने यांना सिनेमातून ब्रेक मिळाला. त्यानंतर दोघांनीही अवघं दशक गाजवलं. लव, सेक्स और धोका (२०१०) लक्षवेधून घेणारं शीर्षक हे एकता कपूरची खासियत. अगदी तसेच शीर्षक या सिनेमाचं असलं, तरी वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा सिनेमा चर्चेत राहिला. प्रेक्षक सहज स्वीकारणार नाही अशा पद्धतीनं या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं. जात, वर्ग, भेदभाव, हिंसा, लैगिंक शोषण यावरून समाजात घडणाऱ्या घटनांना या सिनेमानं वेगळ्या पद्धतीनं पडद्यावर मांडलं. विकी डोनर (२०१२) भारतीय समाजात अजूनही वर्ज्य असलेल्या वेगळ्या विषयावरची गंभीर पण हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडलेली गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळाली. आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्यानं न केलेलं काम सुजित सरकारनं सिनेमातून दाखवलं. स्पर्म डोनेट करणाऱ्या तरुणाची भूमिका करणाऱ्या आयुषमान खुराणाला या सिनेमानं ओळख मिळवून दिली. दशक संपत असताना आयुषमान खुराणानं बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून आपली छाप सोडली आहे. पान सिंग तोमर (२०१२) पारंपरिक डाकूच्या प्रतिमेला छेद देत आणि सध्याच्या व्यवस्थेला डाकू तर फक्त संसदेत असतात, असा सवाल प्रेक्षकांना करणाऱ्या पान सिंग तोमरनं डाकूची नवी प्रतिमा तिग्माशू धुलियानं पडद्यावर आणली. आपल्या अभिनयानं सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या इरफान खाननं ही भूमिका अविस्मरणीय ठरावी अशा पद्धतीनं साकारली. एक वेगळ्या धाटणीच्या या सिनेमानं वेगळी प्रेक्षकांबरोबर बॉलिवूडलाही दखल घ्यायला लावली. गॅग्ज ऑफ वासेपूर (२०१२) तगडी स्टार कास्ट आणि दमदार स्टोरी असलेल्या गँग्ज ऑफ वासेपूरमधून गँगस्टरची प्रेक्षकांना बघायला मिळाली. झारखंडमधील वासेपूरमध्ये घडणाऱ्या कथानकाला प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं जिवंतरूप दिलं. भारतीय प्रेक्षकांसाठी हा सिनेमा वेगळा अनुभव देणारा ठरला. विशेषतः कसदार अभिनय असलेल्या मनोज वाजपेयी, तिग्मांशू धुलिया, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पियूष मिश्रा, रिचा चड्डा यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या. द लंच बॉक्स (२०१३) एका टिफिन बॉक्सभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. जेवणाचा डब्बा चुकीच्या पत्त्यावर गेल्यानंतर फुलूणारी प्रेम कथा सगळ्यांना आजूबाजूला घडणारी वाटते. इरफान खान, निम्रत कौर आणि नवाजुद्दीनं या सिनेमात भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही प्रचंड यशस्वी ठरला. क्वीन (२०१४) तरुण तरूणी प्रेमात पडतात. पुढे संघर्ष आणि शेवट, अशा नेहमीच्या चौकटीला क्वीनच्या कथेनं धक्का दिला. तर कंगना रणौतनं अभिनयाच्या जोरावर सिनेमाची सगळ्यांनाच दखल घ्यायला लावली. दिल्लीतील मुलीचं लग्न मोडते आणि ती एकटीच हनीमूनसाठी पॅरिसला जाते. त्यानंतर ही कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. या सिनेमाने कंगना रणौतला बॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. मसान (२०१५) आजचा आघाडीचा अभिनेता विकी कौशलचा पहिला सिनेमा. ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बनारसमध्ये सिनेमाची कथा घडते. भारतीय समाजातील प्रथा, परंपरा, जात संघर्षाबरोबरच आजच्या भारताचं चित्र मसान मांडतो. एक जोडप्याची या सगळ्या चौकटीतून बाहेर पडण्याची धडपड. ते अपूर्णच राहिल्यानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद पेरणारा मसान, बॉलिवूडमधील वेगळा सिनेमा ठरला. दम लगा के हैशा (२०१५) झिरो फिगरची म्हणजे आदर्श असं एकेकाळी रूजवणाऱ्या बॉलिवूडने जाडेपणातलं सौंदर्य सांगणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला. कथा आणि गाणी प्रेक्षकाला नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देते. तर भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराणा ही जोडीनं साकारलेली नवरा-बायकोची भूमिका प्रेक्षकांनाही भावते. समाजातील सौंदर्याच्या व्याख्येलाच आव्हान दिलं. पिंक (२०१६) एकीकडे विविध क्षेत्रातील महिला स्वतःवर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडत असताना बॉलिवूडनं सगळ्यांना विचारमग्न करायला लावला चित्रपट प्रेक्षकांना दाखवला. पिंक सिनेमाने महिला अत्याचारांच्या विषयाकडे समाजाला वेगळ्या नजरेतून बघायला लावले. नाही या एका शब्दाभोवती चित्रपटाची कथा फिरत राहते. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांच्या भूमिका आणि संवादफेक सिनेमानं महिला अत्याचाराच्या प्रश्नाची नव्यानं मांडणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. न्यूटन (२०१७) समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी भागातील दंडकारण्यात ही न्यूटनची कथा आकार घेते. आदिवासींचं जगणं. प्रशासनाची उदासिनता आणि नक्षलवादी-लष्काराचं वाढलेलं वर्चस्व यामुळे आदिवासीचं आयुष्य कसं बंदिस्त झालं आहे. याचा वेध सिनेमा घेतो. अभिनेता राजकुमार रावच्या मतदान अधिकाऱ्याच्या भूमिकेसह पंकज मिश्रा आणि अंजली पाटील यांनीही दमदार अभिनय केला. लिपस्टिक अंडर माय बुरखा (२०१७) सामाजिक मानसिकतेच्या चौकटीमुळे महिलांची होणारी घुसमट आणि त्यांच्या जगण्याच्या सुप्त इच्छा यावर लिपस्टिक अंडर माय बुरखा प्रकाश टाकतो. एक महाविद्यालयीन विद्यार्थी, ब्युटी पार्लर चालवणारी महिला, गृहिणी अशा पात्रांभोवती सिनेमाची कथा फिरते. विषय आणि मांडणी यावरून हा सिनेमा वादग्रस्त ठरला होता. मात्र, सामाजिक व्यंगावर भाष्य करणारा हा सिनेमा या दशकातील उत्तम सिनेमापैकी एक ठरला आहे. मुल्क(२०१८) मुस्लिम म्हणजे दहशतवादी अशी काहीशी मानसिकता भारतीय समाज मनामध्ये दिसून येते. या मानसिकतेवर बोट ठेवत अनुभव सिन्हा यांनी मुल्क सिनेमातून वेगळ्या पैलूवर भाष्य केलं आहे. हिंदू आणि मुस्लीम समुदायातील वाढत चाललेली दरी, आपण आणि ते, अशा वेगवेगळ्या संघर्षांचा हा सिनेमा वेध घेतो. तुंबाड (२०१८) भयपटाच्या श्रेणीतील हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला. स्वातंत्र्यपूर्व भारतात चित्रपटाचं कथानक सुरू होतं. हव्यासामुळे माणूस कसा आत्मनाश करून घेतो गोष्टीभोवती सिनेमा फिरत राहतो. भयपटांच्या बॉलिवूडच्या नेहमीच्या साच्याला तोडत सिनेमानं स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. गल्ली बॉय (२०१९) सरत्या वर्षातील महत्त्वाचा सिनेमा. कथा, गाणी आणि अभिनय या बळावर गल्ली बॉयचं ऑस्करसाठीही नामांकन झालं होतं. रणवीर सिंग, आलिय भट्टसह कलाकारांचा अभिनय, अप्रतिम संवादफेक यामुळे झोया अख्तरचा गल्ली बॉय नव्या पिढीला प्रचंड भावला. आर्टिकल १५(२०१९) भारतीय संविधानानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे. पण, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आजही अस्पृश्यता तशीच टिकून आहे. संविधानाताली आर्टिकल १५ वर बेतलेला आणि आजचं समाज वास्तव प्रभाविपणे मांडणारा सिनेमा आयुषमान खुराणानं आपल्या अभिनयानं आणखी नव्या उंचीवर नेऊन ठेवला. समाजातील वस्तुस्थितीला भिडणारा आर्टिकल १५ मावळत्या वर्षातील महत्त्वाचा सिनेमा ठरला.