केरळमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं आता स्पष्ट होत आहे. पावसामुळे आलेल्या पुराचं पाणी राज्यातील सर्वच गावांमध्ये शिरल्यामुळे नुकसानाचा आकडा वाढतच जात आहे. ज्यामुळे सध्याच्या घडीला या राज्याच्या मदतीसाठी सर्वांनीच पुढे येत मदतकार्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात कलाकार मंडळीही मागे नाहीत.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून अक्षय कुमारपर्यंत प्रत्येकाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या परिने सहकार्य केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी केरळमध्ये बचावकार्यात योगदान म्हणून ५१ लाख रुपयांचा निधी दिला. त्याशिवाय त्यांनी या आर्थिक मदतीबरोबरच केरळच्या नागरिकांसाठी आपले काही कपडेही दिले आहेत. ६ पेट्या भरुन असलेल्या या कपड्यांमध्ये ८० जॅकेटस, ४० बुटांचे जोड, २५ पॅंट आणि २० शर्ट आणि काही स्कार्फ यांचा समावेश आहे.

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

गरजवंतांना मदत करणाऱ्या बिग बींची केरळकडून आभार मानण्यात आले. पण, सोशल मीडियावर मात्र एका युजरने त्यांना खोडकर प्रश्न केला. बच्चन यांनी रेकॉर्डींग स्टुडिओमधील एक फोटो पोस्ट केल्यानंतर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिलं, ‘केरळमधील गरजूंना तुम्ही मदत केली का?’ त्या युजरच्या प्रश्नाला उत्तर देत बिग बींनी लिहीलं, ‘हो दिली… तुम्हाला याविषयी कळेलच. पण, तुमचं काय? तुम्ही मदत केली का?’ आपल्या फोटोवर कमेंट करणाऱ्याला बिग बींनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. कोणत्याही विषयाचं गांभीर्य लक्षात न घेता त्यावर कमेंट करणाऱ्यांवर कुठेतरी आळा घालण्याची गरज असून, आता खुद्द सेलिब्रिटींनी पुढे येत यासाठीची पावलं उचलल्याचं स्पष्ट होत आहे.