काही चित्रपट हे कालातीत असतात. अनेकवेळा पाहूनही या चित्रपटांचा कंटाळा येत नाही. १९९७ साली प्रदर्शित झालेला असाच एक चित्रपट पाहून आजही डोळे पाणावतात. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने 'देशभक्ती' दाखवली होती. उत्कृष्ट कलाकार, कसदार अभिनय, मनाला भिडणारे संगीत या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे या चित्रपटाने १९९७ साली सर्वाधिक कमाई केली होती. हा चित्रपट म्हणजे 'बॉर्डर'. भारत-पाकिस्तान युद्धाची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. जे. पी. दत्ता दिग्दर्शित हा मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन १३ जून रोजी २२ वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाने लेफ्टनंट धरमवीरची भूमिका साकारली होती. अक्षयआधी या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना विचारण्यात आले होते. यामध्ये सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि सैफ अली खान या अभिनेत्यांचा समावेश होता. सलमानने या भूमिकेला नकार दिला होता. आमिर खान त्यावेळेस ‘इश्क’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होता म्हणून तोही ही भूमिका करू शकत नव्हता. सैफ व अक्षयनेही भूमिकेला नकार दिला. अजय देवगणला मल्टीस्टारर चित्रपटामध्ये काम करायचे नसल्याने त्यानेही भूमिका नाकारली. शेवटी ही भूमिका अक्षय खन्नाने साकारली. या चित्रपटासाठी मनीषा कोईरालाही करारबद्ध करण्यात आले होते. मात्र नंतर तिने चित्रपट करण्यास नकार दिला.सनी देओलने साकारलेल्या कुलदीप सिंग चांदपूरी यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी जुही चावलाकडे विचारणा करण्यात आली होती. पण ही भूमिका अल्प कालावधीसाठी होती. यासाठी जुही चावलाने भूमिका करण्यास नकार दिला. तब्बूने ही भूमिका साकारली.