चित्रपटांचा हमखास यशस्वी फॉम्र्यूला म्हणून प्रेमकथापटांकडे पाहिले जाते. प्रेमकथापटांचा इथून तिथून फॉम्र्यूला एकच असतो. परंतु प्रत्येक दशकागणिक हिंदी-मराठी सर्वच भारतीय चित्रपटांमध्ये प्रेमकथा निरनिराळ्या पद्धतीने उलगडण्यात आली आहे. म्हटले तर चावून चोथा झालेला विषय. परंतु rv14लेखक-दिग्दर्शकाने प्रेमाचा गुलकंद अतिशय तरलपणे प्रेक्षकांसमोर सादर केला आहे.
प्रेमात पुढाकार कोणी घ्यायचा, कुणी कुणाला पहिल्यांदा विचारायचे याचे जणू ठोकताळे निश्चित झालेले असतानाही या ठोकताळ्यांना छेद देऊन ‘अखेर ती दोघे सुखाने संसार करू लागली.’ अशाच पद्धतीचा पण सूचक शेवट करतानाही दिग्दर्शकाने प्रेमाच्या आणाभाका, रूपेरी पडद्यावरचे ‘टिपिकल’ प्रेम दाखविण्याच्या खूप पलीकडे प्रेक्षकाला नेण्याचा झकास प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईला भिडणाऱ्या पद्धतीने प्रेमकथा सादर केली आहे.
सततची हुरहुर. बोलायचं तर आहे, पण बोलणार कसं, त्यानं आधी विचारायचं की तिनंच पुढाकार घ्यायचा. मग होणारी घालमेल पण त्याचबरोबर मनातून एक ठाम आश्वासकता. एकदम ‘टिपिकल’ आणि तारुण्यात हमखास घडणाऱ्या या विषयावर आजवर शेकडो चित्रपट आले आणि गेले. किंबहुना चित्रपटात हमखास हिट होणारा फॉम्र्यूला म्हणून वापरला जाणारा घासून गुळगुळीत झालेला विषय, मात्र तरीदेखील चालणारा. पिढय़ा बदलल्या, समाजमन बदलत गेलं. घाबरट या वर्गात मोडणारं अनेक प्रश्नांचं जाळंदेखील कमी होत गेलं. प्रेमालादेखील तंत्रज्ञानाची जोड मिळाली. पण करिअरच्या चक्रात अडकल्यावर देखील हीच परिस्थिती असेल तर प्रेमाचा गुलकंद चाखणार तरी कसा? त्यातच अनादी काळापासून डोक्यात गच्च ठाण मांडून बसलेल्या कविकल्पनांची ओढ असेल तर मग संपलेच. अशा वेळी शब्द फुटतच नाहीत, मग नजराच केवळ बोलत राहतात आणि कॉफीच्या मंद सुगंधाबरोबर सुरू होते ती एक हळुवार लव्हस्टोरी. प्रेमाची फॅण्टसी न जगलेल्या दोन जिवांची हळुवारपणे प्रेमकथा उलगडून दाखविणारा हा चित्रपट. पदार्पणातच दिग्दर्शकाने जुन्याच फॉम्र्यूल्यावर नवा साज चढवलेली काहीसा ‘पुणेरी टच’ असलेली फॅण्टसी म्हणजे ‘कॉफी आणि बरंच काही..’
एका सॉफ्टवेअर कंपनीत नव्याने आलेली जाई आणि निषाद यांच्यात कॉफीच्या संगतीने फुलणारी ही कथा. कामाच्या निमित्ताने जवळीक वाढते, ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं, पण ते व्यक्तच होत नाही. त्यातून मग एक असह्य़ तगमग. आपण एकमेकांसाठी आहोत हे मनोमनी जाणून असतात, पण बोलणार कोण, कसे आणि कधी इथंच घोडं पेंड खातं. दुसरीकडे घरची मंडळी ‘काही’ गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात असा धोशा लावून बसलेली. मग दोघांच्या अबोल प्रेमाला व्यक्त होण्याची संधी केव्हा कधी आणि कशी मिळते?
म्हटलं तर अगदी इटुकला विषय. प्रेमात पडलेल्या दोन जिवांना जसं सारं जग आपल्याभोवतीच फिरतंय असं वाटतं तसंच सारं कथानक गुंफलेलं. त्यामुळेच बारीकसारीक बारकावे मांडत कथानक पुढे सरकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘टिपिकल लव्हस्टोरी’प्रमाणे गाण्यांचा तडका येथे नाही. अबोलतेच्या पातळीवर व्यक्त होणारी दोनच गीतं खूप काही सांगून जाणारी आहेत. त्यातही ‘रंग हे नवे नवे’ हे मराठी, इंग्लिश आणि हिंदीचे अफलातून मिश्रण असलेलं आणि दुसरं थेट गजानन वाटवे यांनी संगीत दिलेलं मंगेश पाडगावकर यांचं गाणं काहीसं रागदारीवर बेतलेलं. अर्थातच कथेतील मांडणीला पूरक अशीच श्रवणीय गाणी असून ती कथेला पुढं नेणारी ठरतात.
बावरलेली, प्रियकराच्या हाकेसाठी आसुसलेली मात्र फॅण्टसीत अडकलेली तरुणी प्रार्थना बेहरेनं समर्थपणे साकारली आहे. गोंधळाचे आणि त्याच वेळी हुरहुर लावणारे स्वाभाविक भाव अल्लडपणे उमटताना दिसतात. काहीसा अबोल, एकटा एकटा वावरणारा आणि प्रेमात अडकलेला पण नक्की काय करावं या द्विधा मन:स्थितीत अडकलेला, काहीसा गंभीर वाटावा असा, पण प्रेमाची चाहूल लागलेला असा ऑफिसमधला सीनिअर तरुण वैभव तत्त्ववादीने चांगलाच साकारला आहे. विशेष म्हणजे दोघांच्याही सोबतीला असणारे जाईची बहीण आभा आणि  जाईला मागणी घालून भेटायला आलेला अनिष  ही पात्रं थेट दुसऱ्याच टोकावर असणाऱ्या तरुणाईचं प्रतीक मांडणारी असल्यामुळे कथेला चांगली चालना मिळते.
थोडक्यात काय तर प्रेमावर प्रेम करणाऱ्यांना हमखास आवडणारा असा हा चित्रपट आहे. कारण कोणत्याही गर्दीत आपली म्हातारी त्याला नेमकी सापडतेच. आपलं स्वत:चं असं काही तरी आयुष्याच्या अखेपर्यंत असण्याची भावना त्यात उमटते. फक्त गरज असते ती तिला वेळीच आश्वस्त करण्याची, नाहीतर मग एकटय़ानेच कॉफी पिण्याची वेळ येते. अर्थातच आश्वासकतेच्या मुद्दय़ावर चित्रपट संपत असल्यामुळे त्यात उगा रडारड नाही की फार फिल्मीगिरी नाही, गाण्यांचा भडिमार नाही की उगीचच प्रेमिकांची साहसदृश्यं नाहीत.
आटोपशीर, प्रेमकथापट असूनही गाण्यांचा भडिमार आणि आतापर्यंत प्रेक्षकांनी हजारदा रूपेरी पडद्यावर पाहिलेली प्रेमकथापटांतील ‘टिपिकल’ दृश्यं वगळून हा प्रेमाचा गुलकंद प्रेक्षकांना चाखायला दिला आहे.

पूजा छाब्रिया, रवी जाधव प्रस्तुत
कॉफी आणि बरंच काही
निर्माता – प्रकाश कुंटे
दिग्दर्शक – प्रकाश कुंटे
पटकथा – अदिती मोघे
संगीत – आदित्य बेडेकर, स्व. गजानन वाटवे
संकलन – मयूर हरदास
कलावंत – प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, सुयश टिळक, अनिता दाते, अश्विनी एकबोटे, अविनाश नारकर, विद्याधर जोशी, नेहा महाजन, संदेश कुलकर्णी, सुहास जोशी, दिलीप प्रभावळकर.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”